भावनिक श्रम

वंदना पलसाने अर्थकारण
०१ जानेवारी २०२५

आपल्याला शारीरिक- मानसिक श्रम माहिती आहेत, भावनिक श्रम ही संकल्पना आपल्याकडं नवीन आहे. जगभरातील अर्थव्यवस्था औद्योगिक उत्पादन पद्धती सोडून सेवा उद्योगांकडे संक्रमित होत आहेत आणि सेवा क्षेत्र हे देशाचं राष्ट्रीय उत्पन्न वाढण्याचं आणि रोजगाराचं महत्त्वाचं साधन बनलं आहे. सेवा उद्योगांमध्ये कामगारांच्या कामामध्ये शारीरिक श्रमाबरोबर त्यांच्या भावनिक श्रमांचा बहुमोल वाटा असतो. काय आहेत ते भावनिक श्रम आणि ते करणारे कोणत्या अवस्थेतून जात आहेत, या श्रमाचा कसा आणि का विचार झाला पाहिजे, या नव्या विचारासह साऱ्याजणीची अभ्यासू कार्यकर्ता मैत्रीण विचारमंथन घडवू पाहत आहे. नव्या वर्षात नवी आव्हानं असणारा हा विषय समजून घेऊया.

एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर आपली अपेक्षा काय असते? आपण तिथे केवळ जेवणाचा आनंद घ्यायला जातो की तिथल्या आतिथ्यशील वातावरणात डुंबायला जातो? त्या ठिकाणी आपण कुणीतरी खास आहोत अशी जी भावना आपल्याला दिली जाते, ती खूप सुखावणारी असते. अन्न सगळीकडे कमी अधिक प्रमाणात सारखेच असते, वेगळेपण असते ते अन्न कुणी वाढले आणि कसे वाढले, यामध्ये! जेवण आणि ते जे 'काहीतरी खास' जेवणासोबत मिळते, त्याचीच किंमत आपण तिथे मोजत असतो. आपल्या लक्षात तेव्हा येत नाही की आपल्याला हा 'खास' अनुभव देणारी व्यक्ती त्या ठिकाणी विशिष्ट प्रकारचे 'भावनिक श्रम' करते आहे. त्यासाठी तिला ग्राहकांना आकर्षित आणि खूश करण्यासाठीचे विशेष प्रशिक्षण दिले गेले आहे.

प्रशिक्षण केंद्रातील एक ट्रेनर म्हणते, “आमच्या धंद्याचा मुख्य केंद्रबिंदू माणूस असतो. आम्हाला प्रत्येकाशी माणूस म्हणूनच कनेक्ट व्हावे लागते. इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपल्याला काहीतरी खास समजले जावे अशी अपेक्षा असते, त्यामुळे शक्यतो आम्ही सेवाकर्मींनी नियमित ग्राहकांची नावे लक्षात ठेवणे, त्यांच्या चहा-कॉफी किंवा जेवणाच्या आवडी-निवडी लक्षात ठेवणे आणि त्यानुसार सेवा देणे, यासाठी विशेष प्रशिक्षण देतो. गिऱ्हाईकांचे समाधान हाच आमच्या धंद्याचा पाया आहे.”

श्रमाबद्दल बोलताना, लिहिताना बहुतेक वेळा आपल्या नजरेसमोर श्रमणारे शरीर असते. श्रम म्हणजे शारीरिक श्रम असे आपण गृहीत धरतो. याचे कारण जुन्या अर्थव्यवस्थेमध्ये बहुतांश कामे कारखान्यांमधून होणाऱ्या वस्तूंच्या उत्पादनाशी संबंधित असत, ज्यामध्ये कामगाराच्या शारीरिक श्रमाचा अधिक वापर होत होता. मात्र जागतिकीकरणानंतरच्या पन्नास वर्षात जग आणि आपला देश पुष्कळ बदलले आहे. अर्थव्यवस्था, उत्पादनाच्या पद्धती, तंत्रे, काम, कामाचे ठिकाण, कामाच्या ठिकाणची परिस्थिती, यांचे स्वरूप आता पूर्वीसारखे राहिले नाही. नव्या अर्थव्यवस्थेतील बहुतांश कामे वस्तूंच्या नाही तर सेवांच्या उत्पादनाशी संबंधित झाली आहेत. नव्या अर्थव्यवस्थेत वाहतूक, पर्यटन, आतिथ्य, माहिती, वित्त या आणि अशा अनेक सेवा उद्योगांचा समावेश दिसून येतो. नोकऱ्यासुद्धा आता अशाच सेवा उद्योगांमधून उपलब्ध होताना दिसतात.

अर्थातच त्यामुळे कामाचे स्वरूप मुळातून बदललेले दिसते. कामाचे स्वरूप बदलले की कामाचे ठिकाण आणि त्याला लागणाऱ्या श्रमाचे स्वरूपसुद्धा अर्थातच बदलते. त्याचबरोबर या कामांसाठी लागणारे कामगार आणि त्यांची कौशल्येसुद्धा आता वेगळी लागतात. उदा. हवाई वाहतूक कंपन्या आपल्याकडील सर्विस स्टाफ निवडताना रंग, रूप, उंची, इत्यादी पाहतात, हे आपल्याला माहित आहे. पण त्यापुढे त्यांच्या प्रशिक्षणाच्या दरम्यान त्यांना पुन्हा पुन्हा त्यांचे ‘स्मित’ त्यांच्या कामाचा भाग म्हणून किती जास्त महत्त्वाचे आहे आणि त्यांनी ते कसे जास्तीत जास्त वापरायचे आहे, हेसुद्धा सांगतात. हसतमुख राहण्याच्या, स्मित करण्याच्या त्यांच्या क्षमतेवर त्यांच्या नोकऱ्या आणि बढत्या अवलंबून असतात. ग्राहकाने एखादी हवाई वाहतूक कंपनी निवडण्यासाठी हवाई सुंदरी आणि इतर स्टाफचे स्मित आणि एकूणच नम्र, आपुलकीचे वर्तन, यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. हवाई सुंदरी स्मित करत सर्वांशी हसत, बोलत असेल तर विमानात सर्व आलबेल आहे असा विश्वास पॅसेंजरला वाटतो.

एखाद्या व्यक्तीचे स्मित ही त्या व्यक्तीची वैयक्तिक बाब आहे असे आपण सर्वसाधारणपणे मानतो. म्हणजे केव्हा स्मित करायचे, कुणासाठी करायचे, इत्यादी बाबी अतिशय वैयक्तिक असतात. प्रेम, राग, द्वेष, माया, या आणि अशा इतर अनेक भावनांचा आपण बाजारपेठेमध्ये विकल्या जाणाऱ्या गोष्टींमध्ये समावेश करत नाही. त्यांना आपण व्यक्तीच्या 'वैयक्तिक' जीवनाचा भाग मानतो. पण सेवा उद्योगामध्ये व्यक्तीचे ‘स्मित’ हेच एक उत्पादन असते आणि कंपनी ते आपल्या नफ्यासाठी वापरत असते.

भावनिक श्रम ही संकल्पना आपल्याकडे नवीन आहे. त्याचा अर्थ नेमका काय, ते समजून घेऊ. जगभरातील अर्थव्यवस्था औद्योगिक उत्पादन पद्धती सोडून सेवा उद्योगांकडे संक्रमित होत आहेत, आणि सेवा क्षेत्र हे देशाचे राष्ट्रीय उत्पन्न वाढण्याचे आणि रोजगाराचे महत्त्वाचे साधन बनले आहे. सेवा उद्योगांमध्ये ज्या प्रकारचे काम असते तिथे कामगारांच्या कामामध्ये शारीरिक श्रमाबरोबर त्यांच्या भावनांचा आणि दिसण्या-बोलण्याचाही समावेश होताना दिसतो. खास करून, आंतरक्रियात्मक सेवा उद्योगांमध्ये, जिथे सेवा देणारी व्यक्ती आणि सेवेचा उपभोग घेणारी व्यक्ती एकाच ठिकाणी समोरासमोर असते (उदा. आतिथ्य उद्योग, पर्यटन उद्योग, हॉटेल उद्योग, हवाई वाहतूक उद्योग, समुपदेश). अशा कामाच्या जागी भावनिक श्रमांचे महत्त्व मोठे असते. सेवेचे उत्पादन आणि त्या सेवेचा उपभोग जेव्हा एकाच वेळी होत असतो, आणि सेवा देणारी आणि सेवा घेणारी व्यक्ती एकाच वेळी एके ठिकाणी असते, तेव्हा सेवा देणाऱ्या व्यक्तीला आपल्या भावनांचा वापर सेवा घेणाऱ्या व्यक्तीला आपल्या प्रभावात आणण्यासाठी करावा लागतो. म्हणजेच, सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्याच्या भावनांना तेव्हा व्यापारी मूल्य प्राप्त होत असते. आपण पाहतो की या प्रकारचे भावनांचे व्यापारीकरण नव्या अर्थव्यवस्थेमध्ये सर्वसामान्य बाब झाली आहे. नव्या अर्थव्यवस्थेमध्ये बहुसंख्य रोजगार सेवाक्षेत्रातील असल्यामुळे कामगारांना शारीरिक श्रमाबरोबर भावनिक श्रम करणे अपरिहार्य झाले आहे. जुन्या अर्थव्यवस्थेमध्ये कामगारांच्या शारीरिक कृतींचे नियंत्रण आणि नियोजन केले जात होते, आता नवी कामाची ठिकाणे अधिकतर सेवा उद्योग आहेत आणि इथे शारीरिक श्रमांचे नियोजन तर होतेच पण भावनांचेसुद्धा काटेकोर नियोजन केले जाते. ग्राहकांच्या भावनांशी खेळून कंपनीचा व्यवसाय वाढवण्यासाठी कंपनीचे व्यवस्थापन आपल्या सेवा कामगारांना भावनिक श्रमासंबंधी प्रशिक्षण देते.

१९८३ मध्ये समाजशास्त्रज्ञ आर्ली होशचाईल्ड यांनी आपल्या ‘The Managed Heart’ या पुस्तकामध्ये भावनिक श्रम या संकल्पनेची विस्तृत चर्चा केली. होशचाईल्ड यांच्या मते भावनिक श्रम म्हणजे 'कामाच्या ठिकाणी मालक किंवा व्यवस्थापकाने कंपनीच्या फायद्यासाठी ठरवलेल्या नियमांनुसार कामगाराने आपल्या भावनांचे नियोजन आणि दिखावा करणे'. कामगाराने ग्राहकांसमोर आपल्या भावना, आपला चेहरा आणि शरीर कसे वापरावे यासंबंधी सेवा उद्योग अतिशय स्पष्ट आणि काटेकोर नियम बनवतात. भावनिक श्रमाचा उपयोग ग्राहकाच्या भावनांना विविध प्रकारे प्रभावित करण्यासाठी होतो. सेवा देणारे कोण आहेत, ग्राहकांशी ते कसे वागतात, बोलतात यावर ग्राहक परतून येणार की नाही हे अवलंबून असते. सेवा देणारी व्यक्ती ग्राहकांच्या थेट संपर्कात असते. सेवा कामगाराचे नम्र, प्रसन्न, हसतमुख असणे, ठरावीक शब्दांमध्ये, ठरावीक पद्धतीने प्रतिसाद देणे यावर सेवेची गुणवत्ता आणि तात्पर्याने सेवाउद्योगाचा नफा ठरतो.

सेवेतील भावनिक पैलूच्या नफ्यातील या योगदानामुळेच सेवा कामगारांच्या भावनिक क्रियांवर व्यवस्थापनाचे बारीक लक्ष असते. सेवा कामगारांच्या भावनिक कृती अगदी बारकाईने नियंत्रित केल्या जातात. त्यांच्यावर पर्यवेक्षकांद्वारे अथवा कॅमेरे लावून सतत नजर ठेवली जाते. सातत्याने खोट्या भावनांचे प्रदर्शन करत राहणे कुणालाच शक्य नसते. त्यामुळेच सेवा देणाऱ्या कंपन्या कामगारांनी भावनिक श्रम योग्य प्रकारे करावेत यासाठी त्यांना नियमित प्रशिक्षण देतात. सेवाकर्मीना कामावर घेताना कामगाराचे लिंग, वय, रूप आणि इतर सामाजिक ओळखी (धर्म, जात, वांशिकता, ई.) यांचे खूप महत्त्व असते.

आर्ली होशचाईल्ड यांनी हवाई वाहतूक करणाऱ्या कंपन्यामध्ये काम करणाऱ्या यात्रेकरूंना सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या श्रमव्यवहारांचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा त्यांना आढळले की एकमेकींशी स्पर्धा करताना या कंपन्यांचा मुख्य भर सेवेच्या गुणवत्तेवर असतो आणि सेवेची गुणवत्ता प्रामुख्याने सेवा कर्मचाऱ्यांच्या भावनिक श्रमावर अवलंबून असते. म्हणून आपल्या ग्राहकांना अत्युच्च प्रकारचे समाधान देण्यासाठी या कंपन्या सेवाकर्मचाऱ्यांच्या भावनांचे बारकाईने नियंत्रण करतात, देखरेख करतात. बाहेरून पाहिल्यावर आपल्याला या कर्मचाऱ्यांचे हसरे सुंदर चेहरे दिसतात. पण शेवटचा निरोप घेईपर्यंत सतत नम्र स्मित करत, सुंदर शब्दांची पेरणी करत प्रत्येक पसेंजर्सबरोबर बोलत राहताना, त्यांच्या प्रत्येक हाकेला आणि गरजेला स्मितहास्याने सामोरे जाताना येणारा ताण कळूनही येत नाही. या मुली इतक्या छान दिसतात, राहतात, बोलतात, सतत स्मित करत, हसत, विनोद करत इकडून तिकडे पसेंजर्ससोबत बोलत फिरत असतात की त्या काम करत आहेत असंच वाटत नाही, किंबहुना ते तसं वाटूच नये अशा प्रकारे त्या प्रशिक्षित असतात. इतर कुठेही काम करताना शारीरिक श्रम करावे लागतात तसेच हवाईसेवा देणाऱ्यांनाही भरपूर शारीरिक पसेंजर्सश्रम करावेच लागतात. खाद्यपदार्थांनी भरलेली ट्रॉली सारखी ढकलत इकडून तिकडे नेताना शारीरिक श्रम तर होतातच, पण ते करताना चेहऱ्यावरची प्रसन्नता ढळता कामा नये, याची खबरदारी त्यांना घ्यावीच लागते. अन्न आणि पेय देता देता आपल्या स्मितातून सर्व काही ठीकठाक आणि सुरक्षित असल्याची ग्वाही पण त्या प्रवाशांना देत असतात.

भावना जरी व्यक्तीच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असल्या तरी जेव्हा त्यांचा व्यावसायिक आणि नियंत्रित आणि बारीक देखरेखीच्या वातावरणामध्ये वापर केला जातो, तेव्हा कामगार त्याची मोठी किंमत चुकवत असतात. एका हवाई सुंदरीच्या शब्दात सांगायचे तर, “कधी कधी मी जेव्हा एखाद्या मोठ्या सफरीवरून घरी परत येते, तेव्हा मी विश्रांतीच घेऊ शकत नाही. मी खिदळत राहते किंवा बडबड करत राहते किंवा मित्र मैत्रिणींना फोन करत बसते. काम संपले असले तरी त्या कृत्रिम वातावरणाने तयार केलेल्या भावनांच्या उत्कट अवस्थेतून मला सामान्य अवस्थेत येताच येत नाही.” भावना व्यक्तीच्या शारीरिक-मानसिक आरोग्याचा एक महत्त्वाचा भाग असतात. सतत खोट्या भावना दाखवत जगणे किंवा खऱ्या भावना लपवणे व्यक्तीसाठी शक्य नसते, योग्यही नसते. अनेक सेवा कामगारांनी प्रचंड थकवा, निराशा, अनिद्रा, ताण, कामातून समाधान न मिळणे, आत्मसन्मानाला धक्का या स्वरूपाच्या शारीरिक-मानसिक आरोग्याच्या तक्रारी नोंदवल्या आहेत. कंपन्यांमध्ये भावना व्यक्त करण्याचे अतिशय काटेकोर नियम असतात (feeling rules, display rules). ते कंपनीने आपल्या फायद्यासाठी बनवलेले असतात. कर्मचाऱ्याचे चालणे-बोलणे, वर्तन एखाद्या पटकथेप्रमाणे ठरलेले असते. सेवाकर्मी आपल्या मर्जीने किंवा आपल्या परिस्थिती प्रमाणे त्यात फेरबदल करू शकत नाही.

सेवा उद्योगातील कर्मचारी कामाचा दिवस संपता संपता भावनिकदृष्ट्या खूप ताण अनुभवतात. सतत खोट्या भावना व्यक्त करत, ग्राहकाची एक न एक इच्छा पूर्ण करण्यासाठीची धडपड त्यांना स्वत:ला नैराश्यात ढकलते. भावनिक पातळीवरील हे ताण व्यक्तीच्या शरीर-मनावर खोल परिणाम करत असतात. अनेक सेवाकर्मी बर्न-आउट, निद्रानाश, निराशा आणि प्रचंड थकव्याची तक्रार करताना आढळतात. त्याचबरोबर कशातच लक्ष न लागणे, रस न वाटणे, कामावर जावेसे न वाटणे अशा तक्रारी सर्वसामान्य आहेत. सेवा क्षेत्रात त्यामुळेच कामगारांचे काम सोडून जाण्याचे प्रमाणही खूप मोठे आहे. सेवाउद्योगातील कामाची ठिकाणे मोठ्या प्रमाणावर कामगारांवर अन्याय करणारी आणि त्यांना कोणत्याही सुरक्षा न देणारी आहेत. अत्यंत कमी पगार, १२-१२ तासांचे काम, कॅमेरे किंवा पर्यवेक्षकाच्या नजरेखाली, अत्यंत नियंत्रित वातावरणात आणि तणावात काम करण्याची सक्ती, अत्यंत सीमित वेळेच्या विश्रांतीच्या, जेवणाच्या सुट्ट्या, अशा वातावरणात सतत गिऱ्हाईकांना खूश करण्यासाठी हसतमुख आणि प्रसन्न राहणे, ही एकविसाव्या शतकातील नव्या अर्थव्यवस्थेतील अनेक कामगारांची कामाची स्थिती आहे. त्यांचे काम वरवर जरी ग्लॅमरस आणि आकर्षक वाटले तरी त्याला प्रतिष्ठा अजिबात नाही. आपापसातील स्पर्धा प्रचंड आहे. म्हणजे एकीकडे गिऱ्हाइकांबरोबर प्रसन्नचित्त राहण्याची सक्ती, आणि दुसरीकडे कामाची ठिकाणे विषमता, उतरंड आणि ताणतणावांनी युक्त. एका मोठ्या हॉटेलमध्ये पुरुषांच्या रेस्टरूममध्ये पंचिंग बॅग्स लावून ठेवल्या होत्या. कर्मचाऱ्याला कुणाचा खूप राग आला किंवा त्रागा झाला तर इथे येऊन पंचिंग बॅगवर आपली चिडचिड आणि राग काढून पुन्हा बाहेर जाताना हसतमुखाने जावे आणि ग्राहकाच्या आनंदाच्या, समाधानाच्या अनुभवात खंड पडू नये, यासाठी हॉटेलने ही सोय करून ठेवली होती. 

एका तारांकित हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणारी एक तरुण मुलगी म्हणते, “माझं वय कमी आहे, तरी मी बारा तासाची ड्युटी करून घरी जाईपर्यंत इतकी थकून जाते की घरच्यांशी चार शब्द बोलावं असंसुद्धा वाटत नाही. कुणाला भेटू नये, कुणाशी बोलू नये, डोळे मिटून, खोलीत अंधार करून मी झोपून जाते. सारं अंग ठणकत असतं, दिवसभर इतक्या लोकांसमोर स्मित करत, नम्रपणे बोलून वागून वीट आलेला असतो. कुठे नाही म्हणायचा प्रश्नच नसतो. मूड कसाही असू दे, घरी काही ताणतणाव असू देत, आम्ही आपले खोटंखोटं हसतच असतो.”

भावनिक श्रमाचा आणि लिंगभावाचा संबंध खूप जवळचा आहे. स्त्रियांना भावनिक श्रम सहज जमतात अशी समाजाची धारणा असते. म्हणून या कामांसाठी स्त्रियांना कामावर ठेवण्याकडे कंपनीचा कल असतो. यामुळे स्त्रियांना सेवा क्षेत्रात चांगला रोजगार उपलब्ध होतो असे जर कुणाला वाटत असेल, तर त्यांचे लक्ष कामाच्या शोषणाच्या पैलूकडे गेले नाही, असेच म्हणावे लागेल. रिसेप्शनीस्ट, होस्टेस, वेट्रेस म्हणून काम करताना या मुली तरुण आणि आकर्षक, गोऱ्या, योग्य बांधा, उंची आणि वजन असलेल्या निवडल्या जातात. या मुलींच्या असण्याने गिऱ्हाईकांसाठी या जागा अधिक आकर्षक बनतात असा समज आहे. त्यांना पदोपदी कसे वागावे, कसे हसावे, कसे बोलावे याचे काटेकोर प्रशिक्षण दिले जाते. 

सुंदर दिसणे, हसतमुखाने गिऱ्हाइकांना खूश करत त्यांच्या अवती-भोवती फिरणे, त्यांना अन्नपदार्थ, पेय इत्यादी वाढणे, यातून या मुलींचे मोठ्या प्रमाणावर लैगिक शोषण होताना दिसते. अनेक अभ्यासातून हे तथ्य समोर आले आहे. या स्त्री कर्मचाऱ्यांचा बौद्धिक विकास किंवा त्यांच्या कौशल्यात या कामांमुळे कोणतीही वाढ होत नाही. नोकरीत त्यांचा केवळ आकर्षक चालती बोलती बाहुली म्हणून वापर केला जातो. गिऱ्हाईकच नाही तर सहकर्मीसुद्धा त्यांना सतत स्पर्श करणे, लैंगिकदृष्ट्या अपमानकारक हावभाव किंवा विनोद करणे, चिडवणे असे वर्तन सहज करतात आणि अशा वर्तनाला या मुलींना सतत सामोरे जावे लागते. त्यांनी अशा प्रकारच्या वर्तनाला चिडून, रागवून प्रतिक्रिया देणे अपेक्षित नसते. अनेक कामाची ठिकाणे त्यांच्या तक्रारी जुमानत नाहीत. कामाच्या ठिकाणी समान दर्जा न मिळणे, सहानुभूती, मैत्रभाव आणि सहकार्य न मिळणे यामुळे या मुली हीन भावनेने ग्रस्त होतात, निराश होतात आणि अनेक शारीरिक मानसिक आजारांना बळी पडतात. गंमत म्हणजे या सर्वाला त्यांनी आनंदी राहून तोंड देण्याची अपेक्षा केली जाते, कारण हेच त्यांचे काम आहे असे मानले जाते.

प्रगत राष्ट्रच नाहीत तर जागतिकीकरणाची धोरणे लागू झाल्यापासून भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये सुद्धा सेवाक्षेत्राचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला आहे. बहुसंख्य रोजगार आता सेवाक्षेत्रातच मिळतात. २०१७ मध्ये देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादना(GDP)मध्ये सेवाक्षेत्राचे योगदान ६१.५% होते. शेतीनंतर आज सेवाक्षेत्रच देशातील सर्वात मोठे रोजगार देणारे क्षेत्र आहे. अशा परिस्थितीत या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक कामगारांच्या श्रमाच्या भावनिक पैलूंचा विचार करणे गरजेचे आहे. श्रम बाजारातील बहुसंख्य रोजगार अनौपचारिक क्षेत्रात मोडत असतात. सेवाउद्योग याला अपवाद नाही. या उद्योगांमध्ये कामाची परिस्थिती (उदा. नोकरीची असुरक्षितता, अनियमित आणि कमी वेतन, कामाचे अनियमित तास, सामाजिक सुरक्षा योजनांचा अभाव) प्रचंड अन्यायकारक आणि विषम आहे. तिथे सेवा कामगाराकडून प्रसन्नचित्त राहून हसतमुखाने सेवा देण्याची अपेक्षा करणे हे या उत्तर-औद्योगिक काळातील कामगाराच्या शोषणाचे एक नवे रूप आहे. 

कामाची व्याख्या करताना शारीरिक श्रमाबरोबरच आता कामाच्या भावनिक पैलूंचा विचार करणे अत्यावश्यक आहे. पाश्चिमात्य देशातील स्त्रीवादी अभ्यासकांनी या मुद्याकडे लक्ष वेधले आहेच पण धोरणकर्त्यांनीसुद्धा या प्रश्नाला तातडीने संबोधित करण्याची गरज आहे. 

वंदना पलसाने, पुणे

vanpalsane@gmail.com