१९७५ मध्ये आंतरराष्ट्रीय स्त्रीवर्षाच्या निमित्ताने आपल्याकडे सुरू झालेल्या विचारमंथनातून 'स्त्रीवाद' या विचारसरणीची प्रथम ओळख झाली. स्त्रीवादाची तात्त्विक पायाभरणी करणारे वैचारिक ग्रंथ, प्रबंध हा एक स्वतंत्र अभ्यासविषय आहे. या लेखात मी स्त्रीवादामुळे चालना मिळून आपल्याकडे झालेले स्त्रीकेंद्री संशोधन लक्षात घेतले आहे. या विषयाची व्याप्ती लक्षात घेता मी येथे या विषयाचा दिशादर्शक स्थूल आराखडा मांडू इच्छिते. येथे 'स्त्रीकेंद्री' संशोधन असा शब्दप्रयोग हेतुतः केला आहे. एखादा नवा तत्त्वविचार जेव्हा ज्ञानक्षेत्रात स्थान मिळवतो, तेव्हा त्याचे सादपडसाद व्यापक विचारविश्वातून येत असतात. त्यातूनच त्या विचाराची प्रभावक्षमता कळत असते.
प्रास्ताविक : येथे 'स्त्रीवाद' ही संकल्पना 'स्त्रीमिती' (२०१०) या पुस्तकासाठी विद्या बाळ यांनी लिहिलेल्या अर्पणपत्रिकेद्वारे स्पष्ट करावीशी वाटते. ते शब्द आहेत: "स्त्रियांनी पुरुषांविरुध्द लढाई करायची ही स्त्रीवादी भूमिकाच नाही. उलट स्त्रियांनी आणि पुरुषांनी, बायकी आणि पुरुषी या पारंपरिक भूमिकांमधून बाहेर पडून, माणूस म्हणून समृद्ध जगण्याची वाट धरावी; ही स्त्रीवादी विचारसरणी आहे." या विचारसरणीमध्ये स्वातंत्र्य, समता, न्याय, श्रम-प्रतिष्ठा आदी मूल्यांबाबत समाजमनात स्त्रीसंदर्भात परिवर्तन घडवणे, हा उद्देश आहे. तिला 'एक सन्माननीय समाजघटक' या नात्याने वरील मूल्ये अनुभवता येणे अपेक्षित आहे. या विचाराचा रेटा असा होता की यामुळे अनेक प्रकारच्या संशोधनांना गती मिळाली. ही संशोधने विविध ज्ञान-शाखांच्या मदतीने झाली. स्त्रीवाद हा विचार साहित्य, समाजशास्त्र, इतिहास, मानववंशशास्त्र, भाषाशास्त्र आदी ज्ञानशाखांकडून मर्मदृष्टी घेत परिणत होत गेला आहे. त्यामुळे ही संशोधने साहित्याचा अन्वयार्थ लावणे, मुलाखती-मनोगते या मार्गे अनुभव संकलन करणे, प्रश्नावली-सर्वेक्षणक्षेत्रभेट इत्यादी मार्ग अवलंबणे, अशाप्रकारे होत राहिली त्यातून ऐतिहासिक परंपरेचे स्वरूप तसेच समकालीन वास्तवाचे चित्रण उजेडात येत गेले. त्या माहितीच्या विश्लेषणातून निरीक्षणे नोंदवत, भारतीय स्त्रीवादासाठी पायाभरणी करणे शक्य होत गेले.या संशोधनांचे नेतृत्व कधी एखादी संस्था, गट किंवा एक व्यक्ती यांनी केलेले दिसते. स्त्रियांनी केलेल्या संशोधन प्रकल्पांचे प्रमाण लक्षणीय दिसते. काही संशोधन प्रकल्प इंग्लिशमध्येही झाले आहेत. येथे त्यातील ठळक संशोधनांचा तीन प्रमुख सूत्रांच्या संदर्भात विचार केला आहे.
१) इतिहासाचे उत्खनन आणि उपेक्षित स्त्रीकर्तृत्वगाथा : आपल्याकडे प्रबोधनकाळात अनेक सुधारकांच्या प्रयत्नांमुळे समाजमन स्त्रीशिक्षण आणि स्त्रीसुधारणा यासाठी अनुकूल होत गेले. मात्र या कालखंडातील कर्तृत्ववान स्त्रियांची चरित्रे पुरेशा प्रमाणात प्रकाशझोतात आली नव्हती. स्त्रीशिक्षणासाठी स्वतःला समर्पित केलेल्या म. फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई, जनाक्का शिंदे, पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे, आनंदीबाई जोशी, 'हे लग्न मला मान्य नाही!' असे निक्षून सांगणाऱ्या रखमाबाई राऊत ही त्यातली काही ठळक नावे आहेत. यांच्या बरोबरीने वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलेल्या आणखी स्त्रियाही उपेक्षितच होत्या. अशा वेळी स्त्रीकेंद्री संशोधनात अग्रस्थानी मान देण्याजोगे काम डॉ.स.गं.मालशे यांनी केले. ताराबाई शिंदे यांचा 'स्त्री-पुरुष तुलना' हा १८८२मध्ये लिहिलेला व अंधारात राहिलेला निबंध मालशे यांनी चिकित्सक संशोधन-संपादन करून 'स्त्रीपुरुष-तुलना' (१९७५) या पुस्तक रूपानेप्रकाशित केला. आंतरराष्ट्रीय महिला वर्षाच्या निमित्ताने हे 'झाकले माणिक' वाचकांसमोर आले. यात एका आपल्याकडील स्त्रीने स्त्रीजातीच्या सनातन दुःखाला वाचा फोडली आहे; हे त्यांना महत्त्वाचे वाटले. मालशे प्रस्तावनेत म्हणतातः "’गतशतकांची पापें घोरें' हे जाणवून गेल्या शतकात लोकहितवादी, फुले, आगरकर व केशवसुत ही चार संतप्त व्यक्तिमत्त्वे उफाळून आलेली दिसतात. या चौघांची, विशेषतः फुल्यांची धाकटी बहीण जणू ताराबाई शिंदे!" हे पुस्तक साहित्यातील स्त्रीपुरुष प्रतिमांची स्त्रीच्या परिप्रेक्ष्यातून चिकित्सा करण्याची भेदक हष्टी देणारे आहे.
"विमेन रायटिंग इन इण्डिया" (व्हॉल्यूम १४२) (१९९१) हा बृहत्-संशोधनप्रकल्प सुझी थारो आणि के. ललिता यांनी पूर्ण केला आहे. त्यात इ.स.पूर्व ६०० ते विसाव्या शतकाचा पूर्वार्ध असा मोठा कालपट समाविष्ट आहे. त्या काळचे विविध भारतीय भाषांमधले स्त्रीची नवी संवेदनशीलता प्रकट करणारे निवडक वेचे इंग्लिशमध्ये अनुवादित केले आहेत. त्यात अर्थातच ताराबाई शिंदे यांना स्थान मिळाले आहे. त्यांच्याविषयी डॉ. विद्युत भागवत यांचे भाष्य असे आहे:- "Her exposure of male stereotypes and images of women appeared almost a century before Simon de Beauvoir's The Second Sex "
एका मराठी लेखिकेचे योगदान असे जागतिक पटलावर नोंदले जाणे, हे डॉ. मालशे यांच्या संशोधनामुळे शक्य झाले आहे. स्त्रीवादाच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ.विद्युत भागवत यांचेही संशोधन इंग्लिशमधून प्रकाशित झाले आहे. त्यांचे 'मानवशास्त्रातील लिंगभावाची शोधमोहीम' हे संशोधन मौलिक आहे. विशेषत: 'जेंडर'साठी योजलेली 'लिंगभाव' ही संज्ञा तात्त्विक विचार काटेकोर राहण्यासाठी उपयुक्त अशी आहे.
टाटा समाजविज्ञान संस्थेच्या स्त्री-अभ्यास केंद्राने डॉ. सुमा चिटणीस यांच्या मार्गदर्शनाखाली १९९० च्या सुमारास पुस्तकमालिका प्रसिद्ध केली. तिचे शीर्षक आहे: 'स्त्रीमुक्तीच्या पाऊलखुणा'. त्यातील इंदूमती शेवडे यांचे 'पाच संत कवयित्री' हे पुस्तक महदाईसा, मुक्ताबाई, जनाबाई, कान्होपात्रा व बहिणाबाई (तुकारामशिष्या) यांचे काळाच्या संदर्भातील वेगळेपण लक्षात आणून देते. 'राजसत्तेच्या फटींमधून पेशवेकालीन स्त्रिया' हे नीलिमा भावे यांचे पुस्तक त्या पुढच्या कालखंडातील निवडक स्त्रियांचे कार्य समोर ठेवते. त्यानंतर विचार मंथन समोर ठेवणारे प्रतिभा रानडे यांचे 'स्त्री प्रश्नांची चर्चा' हे पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे, ताराबाई शिंदे, जनाक्का शिंदे आदी स्त्रियांचे कर्तृत्व प्रकाशात आणणारे पुस्तक आहे - 'स्त्री-अस्मितेचा आविष्कार: एकोणिसावे शतक' (लेखिका मृणालिनी जोगळेकर) आणि शेवटचे पुस्तक आहे विनया खडपेकर यांचे 'स्त्री स्वातंत्र्यवादिनी: विसाव्या शतकातील परिवर्तन' एकंदरीत तेरावे ते विसावे शतक या कालखंडात संत कवयित्री ते शकुंतला परांजपे, विभावरी शिरूरकर यांसारख्या नवीन विचारांच्या लेखिका असा मोठा प्रवास त्यातून अधोरेखित होतो. मूळ प्रकल्पाचे शीर्षक या प्रवासाला अर्थपूर्ण असेच आहे. यात म.फुले, आगरकर आदी सुधारकांचे कार्यही लक्षात घेतले आहे.
स्त्रीसंशोधन प्रकल्प फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित नाहीत. शारदा साठे यांच्या 'क्षितिजावरील शलाका' (२००४) मध्ये दोन हजार वर्षांमधील असाधारण कामगिरी केलेल्या स्त्रियांची ओळख आढळते. त्यात क्लिओपात्रापासून कमला सोहोनीपर्यंत अनेक देशविदेशातील महिला आहेत. 'शाश्वती' या संशोधन संस्थेतर्फे प्रकाशित झालेले अरुणा ढेरे यांचे 'त्यांची झेप, त्यांचे अवकाश' (२०११) हे पुस्तक २०० वर्षांतील भारतभरातील स्त्रीकर्तृत्व सादर करते. त्यात हेमवती सेन, कार्नेलिया सोराबजी, अमृता शेरगील, नूर इनायत खान, नौटंकीवाली गुलाबबाई, नागरत्नम अशा लक्षवेधी स्त्रियांचा समवेश आहे. अरुणा ढेरे यांचे 'विस्मृतिचित्रे' (१९९८) हे पुस्तकही एकोणिसाव्या शतकातील परिवर्तनाच्या प्रक्रियेत विकासोन्मुख अशा स्त्रियांची नव्याने आठवण करून देणारे आहे. त्यात रेबेका सिमियन, सरलादेवी राय, मनोरमा मेधावी, गंगुबाई खेडकर अशा 'स्त्री'त्वाची खूण जाग्या झालेल्या स्त्रियांना न्याय दिला आहे. त्यांच्या कर्तृत्वाला उजाळा दिला आहे.
साहित्यप्रेमी भगिनी मंडळ (पुणे) या संस्थेच्या संशोधन विभागातर्फे डॉ.मंदा खांडगे यांच्या नेतृत्वाखाली प्रकाशित झालेल्या भारतीय भाषांतील स्त्रीसाहित्याचा मागोवा (खंड १ व २)(२००७) या ग्रंथांमध्ये २० भारतीय भाषांमधला १८५० ते २००० या कालावधीतील स्त्रीसाहित्याचा परामर्श घेतला आहे. सर्वसमावेशक दृष्टीने केलेल्या यातील संशोधनातूनही स्त्रीवादी धारणांना बळकटी देणारी माहिती प्रसंगी समोर येते. तसेच यातून इतर भाषांमधील स्त्रीवादी साहित्याचीही ओळख पटते. यात आपल्याला तेलुगु भाषेच्या अच्चमम्बा बंडारू यांना 'पहिली तेलुगु कथाकार’ म्हणून मान्यता मिळवून देण्यासाठी 'अस्मिता रिसोर्स' संस्थेने दिलेल्या लढ्याची हकीकत वाचायला मिळते. साहित्य परंपरेत स्त्री कर्तृत्व डावलण्याचे काही प्रयत्न कसे सार्वत्रिक स्वरुपात घडत असतात त्याचे हे बोलके उदाहरण आहे. डॉ. आश्विनी धोंगडे यांनीही महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) या संस्थेसाठी 'भारतीय भाषांतील स्त्रीवादी साहित्य' (२०१६) हा स्वतंत्र असा प्रकल्प केला आहे.
विशिष्ट क्षेत्रातील अलक्षित स्त्रीकर्तृत्व प्रकाशात आणणारी संशोधनेदेखील उल्लेखनीय आहेत. उर्मिला पवार आणि मीनाक्षी मून यांचे 'आम्हीही इतिहास घडवला' (१९८९) हे पुस्तक एक वेगळे समाजचित्र समोर ठेवते. दलित, आंबेडकरी विचारधारेच्या तळागाळातील स्त्रियांच्या मौखिक इतिहासावर आधारित असे संशोधन या पुस्तकाच्या निर्मितीमागे आहे. यातून उपेक्षित राहिलेले स्त्रीकर्तृत्व मुलाखती आणि आकडेवारीच्या नोंदी या आधारे उठावदारपणे जाणवते. 'बहिष्कृत भारत, 'जनता', 'प्रबुद्ध भारत', 'जयभीम' अशा वृत्तपत्रांच्या आधारे हे संशोधन बळकट झाले आहे. मनीषा पाटील यांचे 'रणरागिनी संयुक्त महाराष्ट्राच्या’ (२०१०) हे पुस्तक देखील एका महत्त्वाच्या राजकीय लढ्याच्या उपेक्षित इतिहासाचा शोध घेते. त्यात सहभागी झालेल्या स्त्रियांचा उल्लेख करून त्यांना न्याय देते. वास्तविक या आंदोलनात वेगवेगळ्या आघाडीवर महिलांचा सहभाग होता. मात्र इतिहासात त्याची नोंद झाली नाही. त्यामुळे हे पुस्तक स्त्रीचळवळींच्या सामाजिक इतिहासाच्या संदर्भातही महत्त्वाचे ठरते. यात लेखिकेने संशोधनाद्वारे ९० रणरागिणींची, तसेच काही महिला शाहिरांची माहिती उपलब्ध करून दिली आहे.
साधना बहुळकर यांचे ‘स्त्रीचित्रकार’ (२०२१) हे पुस्तक बॉम्बे स्कूल कलापरंपरेतील १८५७ ते १९५० मधील स्त्रीचित्रकारांची चित्रे आणि कलासाधना अभ्यासपूर्ण रीतीने सादर करते. कलाक्षेत्रातील स्त्रियांचा सहभाग हा त्यांच्या सर्जनशीलतेचा आविष्कार असतो. त्यांची अभिव्यक्ती ही बाब सामाजिक संदर्भात नक्कीच लक्षात घेण्याजोगी असते: ‘ढोर, चांभार स्त्रियांच्या आंबेडकरी जाणिवांचा परीघ’ (२०२३) हे सुनीता सावरकर यांचे संशोधन डॉ.आंबेडकर पूर्व बहिष्कृत चळवळीतील स्त्रियांची माहिती खणून काढते. आंबेडकरकालीन आणि आंबेडकरोत्तर कालखंडातील स्त्रीजाणीवांमधील बदलाची नोंद यात आकडेवारीच्या नोंदीसकट केली आहे. ऐतिहासिक परिप्रेक्ष्यातून या संशोधनाला महत्त्व आहे.
'इतिहास, स्त्रीवाद आणि विभावरी शिरूरकर’ (२०१२) हे जास्वंदी बांबूरकर यांचे संशोधनपर पुस्तक स्त्रियांचा इतिहास आणि विविध संशोधनपद्धती यांचा अभ्यासपूर्ण वापर करून स्त्रीसाहित्याचे विश्लेषण करते. यातील विभावरी शिरूरकर यांना 'महाराष्ट्रातील स्त्रीवादी चळवळीतील दुसऱ्या लाटेची अग्रदूत' म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न लक्षणीय आहे.
विज्ञानक्षेत्रातील कर्तृत्वाचा शोध घेऊन डॉ. रोहिणी गोडबोले आणि रामास्वामी यांनी तयार केलेला 'लीलावतीज डॉटर' (२००८) हा इंग्लिश ग्रंथ सुमारे शंभर शास्त्रज्ञ महिलांची माहिती उपलब्ध करून देतो. वेगवेगळ्या कार्यक्षेत्रांमधील स्त्रीच्या सहभागाच्या नोंदी समोर आणण्याचे हे काम प्रेरणादायी तर आहेच, शिवाय स्त्रीवरील - तिच्या ज्ञान आणि कला सर्जनविषयक कर्तृत्वावरील - निर्बंध झुगारत तिने केलेली प्रगती दर्शवणारे म्हणूनही महत्त्वाचे आहेत. येथे अंजली मुळे यांनी संपादित केलेले व उर्मिला भिर्डीकर आणि राही डहाके यांनी अनुवादित केलेले 'निःशब्दता ओलांडताना' (२०००) हे पुस्तक आवर्जुन नमूद करावयास हवे. यातील विविध कलाप्रांतात अडथळ्यांची शर्यत ओलांडत काम करणाऱ्या स्त्रियांची मनोगते एका मौखिक कार्यशाळेत व्यक्त झाली आहेत. असे प्रकल्प म्हणजे स्त्रीमनाच्या तळघरातील मूक ध्वनींना शब्दांकित करणारे म्हणूनही महत्त्वाचे ठरतात.
अमेरिकेत जाऊन डॉक्टर झालेल्या डॉ. आनंदीबाई जोशी यांचा जीवनप्रवास हा खरेतर समुद्र ओलांडण्याबाबतच्या निर्बंधालाच केवळ नव्हे तर अशा अनेक निर्बंधांना रोमांचक पध्दतीने ओलांडत साहसी वृत्तीने केलेला यशस्वी प्रवास होता. त्यांच्यावर चरित्रग्रंथ लिहिताना डॉ. अंजली कीर्तने यांनी केलेले संशोधन आणि परिश्रमपूर्वक केलेलाप्रवास विशेष उल्लेखनीय आहे. डॉ. रखमाबाई राऊत यांचा त्या काळचा घटस्फोटाचा गाजलेला खटला तत्कालीन वृत्तपत्रांच्या साहाय्याने क्रमवार समोर ठेवत लिहिलेले मोहिनी वर्दे यांचे 'रखमाबाई: एक आर्त' (१९८२) हे पुस्तकही संशोधनाची ताकद लक्षात आणून देते. रखमाबाईंचा 'हे लग्न मला मान्य नाही!', हा उद्गार तत्कालीन बालविवाह, विषमविवाह या रुढींचा पुनर्विचार करायला लावणारा होता. त्यांनी इंग्रजी वर्तमानपत्रात 'हिंदू लेडी' या टोपणनावाने लिहिलेली पत्रे या पुस्तकाच्या प्रतिपादनाला प्रामाण्याचा आधार देतात. तसेच वीणा गवाणकर यांचे 'लीझ माईटनर'चे चरित्रही जागतिक स्तरावरदेखील शास्त्रज्ञ स्त्रीचे कर्तृत्व कसे पडद्याआड राहिले होते; हे भेदक सत्य उजेडात आणते. लीझ माईटनर पंधरा वेळा नामांकन मिळूनही नोबेल पुरस्कारापासून वंचित राहिली होती.
आपल्याकडील शास्त्रज्ञ महिला डॉ. कमला सोहोनी यांचे वसुमती धुरू यांनी लिहिलेले 'विज्ञानविशारदा' हे चरित्रही संशोधक दृष्टीने लिहिले असून ते तत्कालीन स्त्रीच्या ज्ञानप्राप्तीच्या मार्गातील काटेरी प्रवास स्पष्ट करते.
अशा पुस्तकांची संख्या भरपूर आहे. स्त्रीवादामुळे स्त्रीच्या लेखणीला आणि डोळस संशोधनवृत्तीला आलेली जाग अशा प्रयत्नांमधून प्रकट होते. सामाजिक आणि वाङ्मयीन इतिहास यांचे पुनर्लेखन करायला लावण्याची गरजदेखील या संशोधनामुळे निर्माण झाली आहे. (क्रमश:)
डॉ. नीलिमा गुंडी, पुणे
संदर्भासाठी संपर्क : nmgundi@gmail.com