गेल्या अर्ध शतकात स्त्रीमुक्ती हा लोकशाहीच्या गाभ्याचा महत्त्वाचा घटक आहे याचं भान समाजामध्ये आलं आहे. स्त्रीच्या आंतरिक आणि बाह्य विश्वाचं भान स्त्रियांच्या कवितांमधून प्रतिबिंबित कसं होतं? १९७५ ते २०२४ या कालखंडातली स्त्रियांची कविता त्यांच्या आत्मप्रकटीकरणाचं समर्थ माध्यम कशी आहे याचा वेध साहित्याचा सखोल अभ्यास असणाऱ्या सरिता सोमाणी यांनी घेतला आहे. ‘जे जे व्यक्तिगत ते ते राजकीय’, हे स्त्रीवादाचं मूलतत्त्व स्त्री दुःखाच्या काव्यगत विविधांगी चित्रणात कसं कसं दिसतं? त्यातून परंपरेनं लाभलेला संकोच बाजूला सारत व्यक्तिगत दुःखाचा, वेदनेचा उच्चार करताना स्त्रियांनी उंबरठ्या आतल्या आणि बाहेरच्या स्त्रिया, दलित, मुस्लिम व इतर परिघाबाहेरच्या स्त्रिया अशा सर्व स्त्रियांच्या सार्वत्रिक दुखाला वाचा फोडण्याचं अतिशय महत्त्वाचं काम या कवयित्रींनी कसं केलं आहे याचा लेखाजोखा या लेखात आहे. स्त्रियांच्या या काळातल्या कवितेत विद्रोहाचा पवित्रा, संघर्षाची जाणीव, स्त्रीवादी विचारांचा अंगिकार, बदलती जीवन विषयक, वाङ्मयविषयक प्रगत दृष्टी प्रतिबिंबित होते. त्यामुळे स्त्रियांच्या कवितेकडे अस्वस्थतेतून विधायकतेकडे जाणारी लेखन चळवळ या दृष्टिकोनातून पाहणं शक्य आहे असं लेखिकेचं म्हणणं का आहे हे या महत्त्वाच्या मांडणीतून समजून घेऊ या.
शब्दकोशात ‘चळवळ’ या शब्दाचा शब्दशः अर्थ ‘चलनवलन, हालचाल, अस्थैर्य’ असा आहे. समाजशास्त्रीयदृष्ट्या ‘चळवळ ही एक कृती असून साध्यप्राप्तीसाठी केलेली हालचाल, साध्यप्राप्तीचे साधन म्हणजे चळवळ होय’, असे स्पष्ट केले आहे. ‘स्त्री उवाच’ १९९० या विशेषांकात ‘महाराष्ट्रातील नवी स्त्री-मुक्ती चळवळ : अंतर्गत चिंतन’ या लेखातील छाया दातार यांच्या प्रतिपादनानुसार समाजातील एखादा घटक आपल्यावर होणारा अन्याय ओळखून त्याचे निवारण करण्यासाठी मूलभूत संरचनात्मक बदल घडवून आणण्यासाठी जेव्हा प्रयत्नशील होतो, तेव्हा त्या प्रवाहाला, त्या व्यवहाराला चळवळ म्हणता येते. चळवळीस वैचारिक अधिष्ठान असते, साध्यप्राप्तीसाठी विशिष्ट व्यूहरचना केलेली असते. राजकारण कसे करावे, काय कृती अधिक परिणामकारक होतील हा विचार चळवळ म्हणत असताना अभिप्रेत असतो. चळवळीसाठी जिवंत मन व जिवंत विचारांची आवश्यकता असते. सामाजिक-साहित्यिक-सांस्कृतिक अशा बहुविध दृष्टीने लेखन हादेखील महत्त्वाचा व्यवहार मानला व त्यात चळवळीचे अनेकांगी पैलू प्रतीत होतात. तेव्हा लेखनास चळवळीचे साधन म्हणण्याऐवजी लेखन चळवळही म्हणता येते.
स्त्रीवादी विचारसरणीच्या विविध व्यूहांमधून स्त्रीवादी जीवनचिंतन समजून घेत स्त्रीजीवनासंबंधी त्याचा आविष्कार करणारी, या विचारसरणीतील बलस्थानांची शोषणरहित सामाजिक व्यवस्थेच्या रचनात्मक दिशेने सकारात्मक व परिवर्तनवादी अभिव्यक्ती म्हणजे स्त्रीवादी साहित्य होय. कविता या साहित्यप्रकारांतर्गत स्त्रीवादी जाणिवांचा शोध घेत असता इ. स. १९७५ ते इ. स. २०२४ या कालखंडातील स्त्रियांची मराठी कविता त्यांच्या आत्मप्रकटीकरणाचे समर्थ माध्यम असल्याचे निदर्शनास येते. ‘Personal is Political’ हे स्त्रीवादाचे मूलतत्त्व स्त्रीदुःखाच्या काव्यगत विविधांगी चित्रणाच्या गाभ्याशी दिसते. कुणा एका स्त्रीच्या वाट्याला येणारे दु:ख तिच्या एकटीपुरते मर्यादित वास्तव नाही, तर तिच्यासारखी अवस्था, परिस्थिती इतरही अनेक जणींच्या बाबतीत असते या जाणिवेतून परंपरेने लादलेला संकोच बाजूला सारत व्यक्तिगत दु:खांचा उच्चार करताना स्त्रियांनी उंबरठ्याआतल्या व उंबरठ्याबाहेरच्या स्त्रिया, दलित, मुस्लिम, परिघाबाहेरच्या स्त्रिया अशा सर्वांच्या निमित्ताने स्त्रीच्या सार्वत्रिक दु:खालाही वाचा फोडली. घटनासापेक्ष प्रतिक्रिया नोंदवून दाहक स्त्रीवास्तवाचे दर्शन घडवले. समकालीन स्त्रीप्रश्नांस भिडताना भगिनीभाव व सखीसहवेदन यांतून स्त्रियांच्या मनात निर्माण झालेली एकत्रिततेची भावना स्त्रीकाव्यात प्रतिबिंबित झालेली दिसते. स्त्रियांच्या कवितेने विद्रोहाचा पवित्रा, संघर्षाची जाणीव, स्त्रीवादी विचारांचा अंगीकार, बदलती जीवनविषयक व वाङ्मयविषयक प्रगत दृष्टी मुखर केली. या संदर्भांन्वये स्त्रियांच्या कवितेकडे अस्वस्थतेतून विधायकतेकडे जाणारी लेखन चळवळ या दृष्टिकोनातून पाहणे संभाव्य आहे. मलिका अमर शेख, रजनी परुळेकर, नीरजा, प्रज्ञा दया पवार, कविता महाजन, आसावरी काकडे, अंजली कुलकर्णी, ज्योती लांजेवार, हिरा बनसोडे, उषाकिरण आत्राम, संध्या रंगारी, कल्पना दुधाळ, सुनीता झाडे, योगिनी राऊळ, मीनाक्षी पाटील, सारिका उबाळे-परळकर, योजना यादव, माया पंडित, वंदना भागवत आदी स्त्री-कवींचे काव्यलेखन अनेकविध परिमाणांनी अभ्यासनीय आहे. ह्या स्त्री-कवींचा परामर्श घेत ज्यांच्या कवितेत स्त्रीमुक्ती चळवळीचे पडसाद कालभान व युगजाणीव दोहोंच्या अनुषंगाने उमटलेले दिसतात त्यांची सामाजिक पार्श्वभूमी, एकूण कवितासंग्रह, कवितेची वाटचाल दर्शवत आत्मभान, अस्वस्थता, विद्रोह व समाजव्यवस्थेत आमूलाग्र बदलाचे संसूचन या जाणिवांचे प्रस्तुत लेखात अधोरेखन करत आहे.
कविता केवळ कवितेविषयी बोलत नाही, तर सार्वत्रिक अनुभवांतील आशयाला आकृतिबंध देते. स्त्रीच्या आंतरिक विश्वाचं भान स्त्री-कवितेला पूर्वापार होतं. इंदिरा संत, पद्मा गोळे, अनुराधा पोतदार, प्रभा गणोरकर, सुशीला पगारिया, अनुराधा पाटील ह्यांची कविता या संदर्भांन्वये लक्षात घेता येते. स्त्रीवादी जाणिवांपेक्षा स्त्रीकेंद्री लेखनाबाबत ही नावे अधोरेखित करता येतात. ‘दिगंत’, ‘तरीही..’, ‘दिवसेंदिवस’, ‘वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ’, ‘कदाचित अजूनही’, ‘आता वह्या सगळ्या बुडीत खाती’ ह्या सहा कवितासंग्रहांतून त्यांची कविता काळाचे सहवर्तमान विशद करत प्रवाही राहिली आहे. स्त्रियांच्या सोशिकतेचा व सर्जनशीलतेचा प्राकृतिक संदर्भ अनुराधा पाटील यांच्या कवितेला लाभलेला आहे. तो शांत विधायक सर्जक स्वर अद्यापही जागरूक आहे. जसे की- ‘मी शोधत असते / मातीचा वास येणाऱ्या / आतल्या कोवळ्या काळोखात / स्वतःलाच भेटण्याची / एखादी जागा / जिथं पेरावं लागतं / स्वतःलाच / आणि वाट पाहावी लागते / कवचकुंडलं सोडून / भेगाळलेल्या भुईतून / पुन्हा वर / उगवून येण्याची...' (कदाचित अजूनही, पृ. ९५) स्त्रियांची चिवट प्रवृत्ती, शरीर आणि मन यांतील अतूट नाते हे स्त्री अनुभवविश्वाचे वेगळेपण नोंदवत स्त्रीच्या एकांतालाही कवितेने स्वतंत्र असा कोपरा दिला. भाषेशिवाय जगणे कठीण व्हावे अशा बधिर भोवतालात शरीर-मनाच्या एकतानतेविषयी प्रभा गणोरकर लिहितात, ‘...मी ऐकते पानांची थरथर / वाऱ्याची सळसळ / अष्टदळी लिलीच्या उमलण्याचा आवाज, / भेगा पडलेल्या जमिनीत पावसाचा आवेग शिरताना / होणारा सीत्कार. / माझ्यापुरती ही भाषा मी समजावून घेतली आहे / म्हणून बरे आहे.’ (विवर्त, पृ. ४४) मानवी संस्कृतीच्या मूल्यात्म अनुभवसृष्टीचा पार्थिव गाभा सोलून स्त्रियांनी शब्दांतून एकांताच्या त्या कोपऱ्यात स्वत:चे व्यक्तिमन व पुरुषाचे स्त्रीमन घडवले, त्यातून अप्राप्य सखा व स्नेहार्द मानवी नात्याची आस विदित केली. सुमती लांडे लिहितात, ‘श्वासानंही / ओरखडे / उमटावेत / असा नीरव / आसमंत / देठोदेठी / उमलून / आलेली / शुभ्र / कमळवेळ / आणि / मौनाच्या / किनाऱ्यावरून / सुरू / असलेला / त्याचा तिचा / चिरंतन / प्रवास’ (सुमती लांडे : समग्र कविता, पृ. ८७) स्त्री-कवी स्वत:च्या स्वतंत्र दृष्टीने स्वत:च्या जगाकडे पाहू लागल्या, स्वत:च्या अंतर्यामाचा शोध घेऊ लागल्या, कवितेतलं सौंदर्यभान त्यांनी सांभाळले. प्रतिमा, प्रतीके, व्यंगार्थाच्या शक्यता आजमावत त्यांनी कविता लिहिली. हा टप्पा ओलांडून स्त्री-मुक्ती चळवळीला समांतर अशी स्त्रियांची प्रतिक्रियात्मक कविता बहिर्मुख झालेली दिसते. सर्जनात्मक पातळीवर लेखन ही राजकीय कृती म्हणता येईल अशी स्त्री-अस्मितेच्या हुंकाराची, प्रबळ आत्मसन्मानाची कविता त्यातून आकाराला आली.
१९७५ साली ‘युनो’च्या वतीने जगभर ‘आंतरराष्ट्रीय स्त्री-मुक्ती वर्ष’ साजरे झाले. स्त्री-मुक्ती ही लोकशाहीच्या गाभ्याचा महत्त्वाचा घटक आहे, हे भान आंतरराष्ट्रीय स्त्री-दशकाने दिले. परिणामी स्त्रियांच्या चळवळीला सर्वच क्षेत्रात बळ मिळाले, त्यांची दखल घेतली जाऊ लागली. साहित्य क्षेत्रात मराठी कवितेच्या प्रवाहात गांभीर्याने लेखन करणाऱ्या स्त्रिया इ. स. १९७५ पूर्वीही भावकविता लिहीत होत्या, संयत दु:खाची अभिव्यक्ती त्यात आढळते. बंडखोरीचा पवित्रा घेत स्त्रियांच्या शारीर अनुभवांना भिडण्याचे धाडस प्रथमत: मलिका अमर शेख यांच्या कवितेने केले. ‘वाळूचा प्रियकर’, ‘देहऋतू’, ‘महानगर’, ‘माणूसपणाचे भिंग बदलल्यावर’. ‘भीषण गर्म हवा’, ‘भयचकिताच्या सावल्या’ असे त्यांचे एकूण संग्रह पाहता स्त्री शरीर केंद्रस्थानी ठेवून व्यवस्थेवर प्रहार करण्याची त्यांची धिटाई विलक्षण आहे. ‘वाळूचा प्रियकर’ या कवितासंग्रहातील ‘शरीर सूक्त’ या त्यांच्या पहिल्याच कवितेत ‘चार दिवसाचं अटळ किळसलेलं शरीर’, ‘स्त्रीला युगानुयुगं राहिलेला हा एक गर्भ-वेदनांचा’, ‘हजार रात्रींच्या अश्वथामी चिरंजीव जखमा’ हे सारे व्यक्त करत ‘कोण जातंय् ते अभेद्य गुहेवरून / स्त्री स्वातंत्र्याची पिचकी तुतारी फुंकत’ (वाळूचा प्रियकर, पृ. १३) हा प्रश्न त्यांनी अंतरावर राहून मध्यमवर्गीय स्त्रियांपुरत्या मर्यादित होऊ पाहणाऱ्या स्त्री चळवळीलाही विचारला होता. ‘आता तहाचं पांढरं निशाण घेऊन / घोडा माघारी फिरवणंसुद्धा शक्य नाही / पुढंच जायला हवं’ (तत्रैव, पृ. ३३) म्हणत त्यांच्या कवितेने ‘माणूसपणाचे भिंग’ बदलून ‘शब्द म्हंजे काय असतात? / प्रेम म्हंजे काय असतं ? / ज्ञान म्हंजे काय नेमकं ? / आणि हे सारे प्रश्न म्हंजे काय ? / दुःखाचं उत्तर दुःख म्हंजे काय ? / आयुष्य बऱ्या न होणाऱ्या जखमेसारखं / हा वेदनेचा खजिना कुठवर संभाळू / काय उपयोग याचा ? / ... मी जिवंत आहे / आत्यंतिक जैविक अर्थानं / सामाजिक आर्थिक मानसिक वैचारिक / शाब्दिक पिंजऱ्याच्या बाहेर खूप दूर.../ कुठलीच मुक्ती मुक्तता करत नाही तुमची / कुठलाच मोक्ष देत नाही साक्षात्कार अखेरचा / कुठलंच स्वातंत्र्य देत नाही अस्सल माणूसपण / म्यानातून उपसलेल्या तलवारीसारखं / कुठं असतो आपण ?’ (माणूसपणाचं भिंग बदलल्यावर, पृ. ८-९) अशी सार्वत्रिक भगिनीभावातून भोवतालाची नवी मांडणी करण्याची गरज जाणवून दिली. स्त्री शरीराला मिळणाऱ्या दुय्यम स्थानाचा प्रतिवाद करत स्त्रीला नेमके नव्या जगाकडून काय हवे आहे व काय हरवत चालले आहे, हे भान मलिका अमर शेख यांच्या कवितेत दिसते. त्या लिहितात, ‘मी शोधतेय् आश्वस्त नजर / शोधतेय हिरवं अरण्य / शोधतेय् माझं अवकाश / मी ठोकून तयार करते रस्ता / नव्या नाण्यासारखा चकचकीत / उंच आलापाइतका स्पष्ट घुमावदार / मी रांधतेय् नवे शब्द / मी बांधतेय् कोश पुन्हा जन्मण्यासाठी / मी विणतेय् काही स्वप्नं / एक नवं जग / जिथं नसतील पिंजरे / जिथं नसतील भेसूर चेहरे पाठलाग करणारे / जिथं प्रेमाचा अर्थ प्रेमच असेल / आणि जिथं मला जगावंसं वाटेल सर्वार्थानं पुन्हा पुन्हा’ (तत्रैव, पृ. १०) स्त्री-मुक्ती चळवळ, दलित साहित्याची चळवळ या पार्श्वभूमीवर अत्यंत जोरकस भूमिका घेत कणखर आवाजाची प्रतिक्रियात्मक कविता मलिका अमर शेख यांची ओळख झाली. तथापि, ‘भीषण गर्म हवा’ व ‘भयचकिताच्या सावल्या’ हे संग्रह पाहता चळवळ थंडावली तशी त्यांची कविताही आपसूक मिटत गेली, असे म्हणण्यास वाव आहे. प्रस्थापित समाजव्यवस्थेत स्त्रियांची वास्तविक स्थिती काय आहे, हे दर्शवत लढवय्या भूमिकेतून रजनी परुळेकर व्यक्त झालेल्या दिसून येतात. स्त्री-मुक्ती चळवळीने स्त्रियांच्या न्याय्य हक्कासाठी कायद्यात बदल व्हावेत यासाठी प्रयत्न चालवले होते, त्या काळाची पार्श्वभूमी कवितेला असण्याची दाट शक्यता ‘मिलॉर्ड’ ह्या कवितेबाबत वर्तवता येते. स्त्रियांवरील अन्यायाला दृश्य-अदृश्य हिंसेची किती परिमाणे असू शकतात, ह्याची जिवंत साक्ष स्त्रियांनी द्यावी इतकी चपखल शब्दरचना ह्या कवितेचे बलस्थान आहे. त्या लिहितात, ‘मिलॉर्ड, माझी ही घटस्फोटाची केस चालवताना / दोन्ही बाजूच्या वकिलांचे चेहेरे / दिसत नाहीयत मला / असंख्य स्त्रिया उभ्या आहेत / आपापल्या कैफियती घेऊन / ज्योतीवर झेप घेतल्यानंतर / समर्पणाचे खरे समाधान / मिळतच नाही त्यांना / ज्योत तेवत नाही संथपणे / दिवसरात्र काजळी ओकत / ढणढण जळत राहते उरात / मिलॉर्ड, डोळे चुरचुरताहेत माझे / आणि या न्यायालयांचे छत / काळवंडून चाललेय त्या काजळीने / स्टुडिओत स्त्रियांच्या समस्यांचे चित्रण करणारा / आणि घरात / पत्नीला मारहाण करणारा दिग्दर्शक / बढ़तीकरता बायकोचा वापर करणारा नवरा / नवऱ्याच्या छळाची शिकार झालेल्या स्त्रीला / पुन्हा आपल्या भोगाची / शिकार करणारा वकील / मागच्या पिढीतल्या केशवपन केलेल्या विधवा / आणि सती गेलेल्या स्त्रिया / त्यांचे आत्मेही उपस्थित आहेत / या न्यायालयाच्या आवारात / ...या सामाजिक चौकटीत / स्त्री ही एक शोभेची वस्तू, / एक पदक लोकांत मिरवण्याचे, / मिळवती कामधेनू आणि भोगाची पर्वणी / इथे गरुडझेप असलेली नटीही / निर्मात्याच्या शयनगृहाचा प्रवास केल्याशिवाय / पोहोचू शकत नाही पडद्यापर्यंत / नवऱ्याच्या नपुंसकत्वामुळे / वांझपणाचा शिक्का बसून / छळ सोसलेल्या स्त्रिया / खेड्यातून फसवून आणून / वेश्यागृहात कोंबलेल्या कोवळ्या मुली / जनानखान्यातील शेकडो स्त्रिया / या साऱ्यांचे दबलेले हुंदके / भरून राहिले आहेत / या न्यायालयाच्या कोपऱ्याकोपऱ्यांत / या साऱ्या स्त्रियांच्या मूक आक्रोशाने / हवेचे थर तप्त झालेयत मिलॉर्ड / वरवर शांत दिसणारा पण आतून / वडवानलासारखा धुमसत असलेला / एक समुद्र न्यायालयाच्या भिंतीना फोडून / पसरू पाहतोय आसमंतात / काही कैफियती तर तुमच्यापर्यंत / पोहोचूच शकत नाहीत मिलॉर्ड / कोर्टात सिद्ध करायला अवघड / असे बुद्धिमान पुरुषांचे क्रौर्य / आत्मा पिंजून तयार झालेल्या / परांच्या गादीवर पहुडणाऱ्या गर्भश्रीमंत स्त्रिया / घरांच्या चार भिंतीत चिणलेली / अशी असंख्य मनं / आणि दोन विटांच्या मधल्या जागेत / मुद्रित झालेल्या त्यांच्या शोककथा / ती गूढ लिपी, त्या मूक कैफियती / तुम्ही वाचायला हव्यात मिलॉर्ड’ (पुन्हा दीर्घ कविता, पृ. १-३) स्त्रीकेंद्री कवितेचा परीघ विस्तृत होताना एक निश्चित विचारव्यूह पेलण्यासाठी कविता दीर्घ होत गेलेली दिसते तसेच कोणताही आडपडदा न बाळगता वेदनेचा उच्चार करताना कविता विधानात्मकही होत गेली तरी रजनी परुळेकर ह्यांच्या कवितेने मौलिक सर्जनशील झुंज पेलली. समाजातल्या विसंगतीवर बोट ठेवत कविता म्हणजे केवळ शब्दांची आरास नाही, वेदनेला तर्काच्या कसोटीवर जोखता येत नाही हेदेखील त्यांनी अभिव्यक्त केले. उपरोक्त कवितेच्या अंतिम तुकड्यात त्या स्त्रियांची वर्तमानाशी चाललेली तीव्र झुंज विचारांनी समृद्ध अशा अर्थसघन भाषेत प्रकट करतात. ‘दिवसभरच्या थकव्याने / थोडा घामेजलेला मिलॉर्डचा चेहरा / ओठांना मंद, गुलाबी लिपस्टिक / "मिलॉर्ड, एवढे तरी सांगा / तुमच्या स्वतःच्या संसारात / खऱ्या प्रेमाचा गुलाबी रंग किती? / तुमच्या नितळ कांतीमागे / अपमानाचे काळे चट्टे किती? / तुमच्या तुकतुकीत चेहेऱ्याच्या रंध्रारंध्रात / बलात्काराच्या दडलेल्या कथा किती?" / पण मिलॉर्डचे ओठ घट्ट मिटलेले / कोर्टाची वेळ संपून गेलेली / काचेच्या खोल्यातील स्त्रियांचे / विकल, केविलवाणे डोळे / उरात आशा घेऊन अनिवार उत्सुकतेने / त्या पाहत होत्या मिलॉर्डच्या चेहेऱ्याकडे / पण मिलॉर्डचे ओठ घट्ट मिटलेले / नंतर त्यांचे शरीर / न्यायाधीशाचा गाऊन काढून / संथ पावलं टाकत चालत गेले / घराची वाट / आणि त्यांचा पिळवटला गेलेला आत्मा / खुरडत, खुरडत जिना उतरून गेला / कोर्टाच्या आवारात / नि आवारातल्या बागेत लोंबकळू लागला / एका निष्पर्ण झाडाच्या जरठ खोडावर.’ (तत्रैव, पृ. ४-५) स्त्रियांच्या मनोव्यापारातील आतला अंधार रजनी परुळेकर यांच्या कवितेने उजळून काढला. ‘अखेरचे पत्र’, ‘फेर’, ‘पुरुष’, ‘तरीही सम साधत नाही’ या कविता उल्लेखनीय आहेत. त्यात आकांत आहे, आवेग आहे तरी या धारदार अभिव्यक्तीचा संयत तोल त्यांनी त्यांच्या इतर कवितांमधून सांभाळलेला दिसून येतो, जसे की – ‘एका लाल कमळाच्या रूपाने / गाभाच उमलतो आपल्या व्यक्तिमत्त्वाचा / त्या कमळाचा ओल्या कुंकवासारखा रंग / इतका टवटवीत की त्यावरचे पाण्याचे थेंबही / लाल होऊन खाली टपटपावेत / आणि त्याच्या पाकळ्या / तटस्थ पापण्यांसारख्या पाहात राहणाऱ्या / त्या अवघ्या पाकळ्यांची मिळून / एक विशाल, स्थिर ज्योत बनून / स्वत:कडे जाण्याची वाट दाखवते / स्वत:ला स्वत:चीच केवढी / गाढ, सच्ची सोबत असते / हे अशा वेळी कळते’ (चित्र, पृ. २६) सामाजिक संकेतसरणीची नैतिक चौकट रजनी परुळेकर यांनी मोडली शिवाय स्त्रीप्रतिमा पुरुषसापेक्षतेने रेखाटण्याचे पारंपरिक वळणही मोडले. आत्मरत स्त्रीभावाची मनोनिष्ठ व शरीरनिष्ठ अनुभवपातळीची कलात्मक मांडणी करत, आंतरिक ताणतणावांना काव्यगत आशयात बद्ध करत त्यांनी स्त्रीप्रश्नाला हात घातला.
स्त्रियांची दिवसाची दु:ख तर कवितेने मुखर केलीच, रात्रीच्या दु:खालाही आवाज दिला. नीरजा यांच्या ‘प्रिय आईस’ व ‘जन्म प्रेषितांचे’ ह्या कविता त्यासंदर्भात उल्लेखनीय आहेत. ‘निरन्वय’, ‘वेणा’, ‘निरर्थकाचे पक्षी’, ‘मी माझ्या थारोळ्यात’ ह्या कवितासंग्रहांतील त्यांची एकूण कविता स्त्रियांच्या वतीने बोलणारी, त्यांचे अंतर्ध्वनी विकसित झाल्यावर बोलण्याची निकड भासणारी कविता आहे. स्त्रियांनी वर्षानुवर्षे फक्त ऐकले, स्त्री-मुक्ती चळवळीने त्यांना बोलण्याची संधी दिली, तेव्हा सुरुवातीला कवितेत स्त्रीदु:खाने व्याकूळ होणे दिसते, त्यानंतर स्त्रीप्रश्न मांडणे हाही लढ्याचा भाग आहे म्हणून हिरिरीने प्रतिवाद करणे आहे, एकाच वेळी साठलेले सारे व्यक्त होताना त्यांच्याही कवितेला ‘मी माझ्या थारोळ्यात’ ह्या संग्रहात दीर्घत्व लाभले आणि अखेरीस तटस्थ शांततेने सामाजिक बदलाचे सूतोवाच नीरजा यांच्या कवितेने केल्याचे नोंदवता येते. स्त्री आहे, कर्तृत्ववान आहे हे सत्तासंबंधांना पेलवत नाही तेव्हा दुभंगत नेणारे धगधगीत वास्तव मांडताना कधी यशोधरा, कधी मोनालिसा, कधी रूपकंवर, कधी विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर, कधी बिल्किस बानो, कधी सनी लिओनी ह्यांच्या नामनिर्देशांसह प्रज्ञा दया पवार यांनी स्त्रीदु:खाला, शोषणाला शब्द देत ‘समग्राशी डोळा’ भिडवला. स्त्री-पुरुष हे द्वैत उभे-आडवे-तिरके छेद देत मानवीय पातळीवर पुन:पुन्हा विचारांच्या केंद्रस्थानी ठेवत त्या कविता लिहीत राहिल्या. ‘अंत:स्थ’, ‘उत्कट जीवघेण्या धगीवर’, ‘मी भिडवू पाहतेय समग्राशी डोळा’, ‘आरपार लयीत प्राणांतिक’, ‘दृश्याचा ढोबळ समुद्र’, ‘हिल्लोळ हरवून आतबाहेरचा’ ही त्यांच्या एकूण कवितेची वाटचाल पाहता स्त्रीविशिष्ट नव-नैतिकतेची घडण त्यांनी केली. मिथकांचे पुनर्वाचन त्यांच्या कवितेचे बलस्थान ठरले आहे. स्फोटक अभिव्यक्ती ते शांतता जगणे, असा त्यांच्या कवितेचा प्रवास म्हणता येईल. त्या लिहितात, ‘कसला मोर्चा आहे हा ? / कुठं चालल्यात सगळ्या बायका ? / ...चालल्यात सगळ्या एकाच दिशेने / ठाम / त्यांच्या किर्र डोळ्यांत / तळपतेय हिंस्त्र शांतता / त्यांचे हात / रिकामे आहेत संपूर्ण, / कुठल्याही क्षणी झडप घालणारे / ...आवरण नाहीये कुठेच-कसलंच / उपसून काढलंय त्यांनी स्वत:लाच / फँटसीजच्या दलदलीतून / धर्म-राष्ट्र-इतिहास-सभ्यता नि संस्कृती / कुठून निघाल्यात / कुठे पोचणार आहेत / स्वत:च हाडामांसाचे झेंडे बनून / लहरणारे उंच-उन्मुक्त / लगदा होऊन / अस्तित्वाचा’ (मी भिडवू पाहतेय समग्राशी डोळा, पृ. ५) स्त्रियांचे अस्तित्व घडवणे, लेखनातून राजकीय भूमिका घेत उपस्थित असणे त्यांच्या कवितेत दिसून येते. ‘हवी होती यशोधरेच्या चेहऱ्यावर / तीच परम शांतता / किंवा / माझ्याही / किंवा / पृथ्वीवरच्या / कुठल्याही / रंगाच्या, / कातडीच्या, / धर्माच्या, / जातीच्या, / वर्गाच्या / बाईच्या चेहऱ्यावर- / तुझ्याइतकं शाश्वत / प्रगाढ बुद्धस्मित’ (तत्रैव, पृ. ११) स्त्रीमनाला जे जे प्रश्न पडत होते ते विचारण्यासाठी कविता हे माध्यम त्यांना मिळाले. प्रस्थापित समाजव्यवस्थेत बदलासाठी सारासार विवेकाने व्यक्त होण्याची गरज स्त्री-मुक्ती चळवळीने जाणवून दिली. कविता लिहिणे हे हत्यार परजण्याइतके प्रसंगी तीव्र झाले ‘अधोरेखित’ या कवितासंग्रहात श्रद्धा पराते लिहितात, ‘...माझ्या डोळ्यांत असतील / क्रांतीची रक्तवर्ण स्वप्ने / श्रृंखलाबद्ध गुलाम इतिहासाच्या / काळ्याकभिन्न छाया.. / ...मी काहीही असू शकेन / सूर्य चंद्र नक्षत्रदेखील / पृथ्वी आकाश शून्यावकाशही / ...भग्न मंदिर किंवा खंडित मूर्ती / किंवा माणूस जिवंत / माणसातील द्वेष करुणा धर्म / आणि युद्ध सुद्धा.’ स्त्रीचे शरीर तिच्या दु:खाचे, शोषणाचे मूळ कारण राहिले हे भान स्त्री-कवितेत उमटले आहे. स्त्रीप्रश्नांची बीजं कवितेत रुजली, कवितेची दिशा विधायक परिवर्तनाच्या उत्तरांचा शोध घेत विकसित झाली.
पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या विरोधात स्त्रियांचे मौन हीसुद्धा किंकाळीच आहे, हा पवित्रा कविता महाजन ह्यांनी घेतलेला दिसतो. ‘तत्पुरुष’, ‘धुळीचा आवाज’, ‘मृगजळीचा मासा’, ‘समुद्रच आहे एक विशाल जाळं’ या सर्व कवितासंग्रहांतून कोणत्या समाजशास्त्रीय-नीतिशास्त्रीय तत्त्वांच्या आधारे स्त्रीवर दुय्यमत्व लादले गेले, तिचे कसे अवमूल्यन केले गेले यासंदर्भात प्रश्न उपस्थित करत एकंदरच मूल्यसंकल्पना व आचारविचार तपासून घेतले पाहिजेत ही जाणीव कविता महाजन यांच्या कवितेने करून दिली. स्त्रियांना आत्मभान आल्याने त्यांना प्रचलित समाजव्यवस्थेचे दबावतंत्र ज्ञात झाले. सजग भोवताल असेल तर कोणतेच दबावतंत्र किंवा कोणतेच आक्रमण संभाव्य नाही. नवी कणखर स्त्रीप्रतिमा व पुरुषप्रतिमा घडवण्याआधी सत्तासंबंधांची सारी वीणच त्यांनी ‘मालक-गुलाम’ म्हणत उसवली. त्यांच्या कवितांमधील उपहास, उपरोध लक्षवेधी आहे तसे कवितांचे वादविवादात्मक विभेदक स्वरूप व रचनात्मकताही वैशिष्ट्यपूर्ण आहे. केवळ आत्मनिर्भरता हे स्त्री-मुक्तीसाठी पुरेसे उत्तर नाही. कुटुंबसंस्थेला पर्याय शोधणे, स्त्री-पुरुष संबंध वैयक्तिक पातळीवर, खासगी व सार्वजनिक अवकाशात कसे असावेत? त्यांची पुनर्रचना करताना किती परिमाणे या द्वैताला असतील, जीवनप्रेरणा व मृत्यूप्रेरणा हे अंतर्द्वंद्व मिटवत विचारांची नवी घडण कशी असावी याबाबत स्त्रीची मूल्यात्मक भूमिका कविता महाजन यांनी प्रस्थापित केली.
जहाल भूमिका न घेता शांत संयत मध्यममार्ग स्वीकारत आसावरी काकडे ह्यांनी सातत्याने कवितालेखन केलेले दिसते. ‘आकाश’, ‘लाहो’, ‘मी एक दर्शनबिंदू’, ‘रहाटाला पुन्हा गती दिलीय मी’, ‘स्त्री असण्याचा अर्थ’, ‘उत्तरार्ध’ हे त्यांचे कवितासंग्रह संपूर्ण स्त्रीनिष्ठ अस्मिताधर्माचे असे नाहीत, तर त्यासोबत एकूणच मानवी जगण्याचे चिंतन कवी मांडते. अंजली कुलकर्णी यांच्या ‘मी: एक स्त्रीजातीय अस्वस्थ आत्मा’, ‘संबद्ध’, ‘बदलत गेलेली सही’ या संग्रहांमधून स्त्रीजीवनाचा तोल सांभाळत विद्रोह व्यक्त झाला आहे. वृषाली किन्हाळकर ह्यांचा ‘वेदन’, सीमा साखरे यांचा ‘बाई’ व योगिनी राऊळ यांचे ‘बाईपणातून बाहेर पडताना’, ‘मुखवटा उतरवल्यावर’ या सर्व कवितासंग्रहांतून स्त्रियांचे संवेदनशील असणे तथा कणखर असणे दोन्ही बाजू प्रतिबिंबित झाल्या आहेत, जीवनसातत्य लक्षात घेत कवितेचे प्रवाही असणे स्त्रियांच्या कवितेच्या एकूण वाटचालीतून जोखता येते. स्त्रियांच्या कवितेत दु:खाचे वेगवेगळे पदर उलगडत स्त्री-कवी लिहितात तरी त्या दु:खाचा आतला पोत सारखाच आहे. विरूप वास्तवाला सामोरे जाताना स्त्री-कवींची विचारप्रक्रिया प्रगल्भ होत आहे, हे लक्षात घेता येते. दिशाहीन भोवताल, नात्यांची पडझड, रूक्ष व बोथट संवेदना, आंतरिक स्नेहाचा अभाव हे अधोरेखन करत कल्पना दुधाळ ‘एकत्र कुटुंब’ या कवितेत म्हणतात, ‘साध्यासुध्या परवानग्यांसाठी ताटकळून ताटकळून / दुखण्यांपासून संपलेल्या कुटापर्यंतच्या कटकटी पचवून पचवून / पस्तावतो नात्यांच्या भेंडोळ्यात घरटं बांधून / हसण्याला उदासीची झालर चिकटून जाते आपोआप / अशातनं सुटका होऊन सुखावते एखादी / पण तीही विसरत नाही / एकत्र असताना रुतलेल्या नख्यांचे ठसे / एखादी अतोनात धमाल करते एकत्र कुटुंबात / जे आपल्याला स्वप्नंच वाटतं स्वप्नातलं / मग असं अवगुण्यागत लिहून / चव्हाट्यावर मांडतो आपण / का निघत नाहीत अजून अजून अवगुणे मार्ग चव्हाट्यावर येण्याचे / का लिहिल्या जात नाहीत अजून अजून अवगुण्या कविता / जेव्हा जेव्हा ऐकवल्या जातील चव्हाट्यावर चढ्या आवाजात / आणि मिळेल दाद / तेव्हा तेव्हा अवगुण्या कवितांच्या आनंदाला उरणार नाही पारावार’(असंग्रहीत) विघटनशील कुटुंबसंस्था, कुटुंबसंस्थेअंतर्गत नात्यागोत्यात फोफावलेल्या विकृती, माणसामाणसांतील तुटत जाणारे संबंध, त्यात होरपळणारे कवीमन व करपत चाललेले भावबंध उपरोक्त कवितेच्या अनुषंगाने प्रतीत होतात. मनात साठलेली त्वेषाची भावना कवितेच्या आशयबंधात व्यक्त करणे कोणीही जाणीवपूर्वक करणार नाही; तथापि, स्त्रियांचे अनुभवविश्व समजून घेत त्याची ध्वन्यर्थप्रधान उकल केल्यास ‘दर दिवसाची ठसठस वेगळी होती / दिवसा लपवली, रात्री तिच्यापासून लपले / भर मध्यान्ही चढता विखार / कमाल निर्दयता, ज्यात ममत्व शोधताना / मालकी हक्काचे गुलामी दावे झेलताना / कठीण झालं ओळखणं / की कोण कोण बोलतंय खऱ्या मनानं / कुणाचं हृदय, मेंदू, विचार शाबूत आहेत / दारात एकही फुलझाड नसलेल्या / कलेच्या मख्ख ओसाडीत / साध्यासरळ एकशेवडी झाडासारखं सहज छाटलं गेलं / माझ्यातलं सदाहरित अरण्य / तेव्हा कुठे माहीत होतं / या लाकूडफाट्यांच्या कागदावरच / हे बरंवाईट हलाहल छापलं देखील जाणारय’ (असंग्रहीत) असे स्त्रीकेंद्री अनुभवविश्वाशी संवादी मर्म कल्पना दुधाळ यांच्या कवितेतून उलगडते. स्त्रीत्वाच्या अस्मितेच्या व स्त्रीशोषणाच्या नाना परीच्या अनेक गोष्टी काव्यगत आशयात आहेत.
‘कॉमन वुमन’, ‘आत्मनग्न’ व ‘शब्दांच्या पसाऱ्यातील अर्थाच्या आत्महत्या’ या संग्रहांतून ‘माणुसकी कड का पालटत नाही’, हा प्रश्न सुनीता झाडे यांना पडतो. त्यांच्या कवितेचे वळण रूढ चाकोरी नाकारणारे असेच राहिले आहे. त्या लिहितात, ‘घरासमोरून गेलं की, / खिडकीतून डोकावतात ओळखीचं / हळूच वेल बाहेर येऊन आत घेते / आत चिल्ल्या-पिल्ल्या झाडांचा पसारा असतो / ...घरातील भांड्यात माती आणि / पाणी भरून ठेवलेलं असतं / स्वयंपाक घरात शुद्ध हवेसाठी / प्रयोग चाललेले असतात / चार जाड बुंध्यात / पाऊस पाण्याची चर्चा होत असते, / चिमण्या-पाखरं, पशू-पक्षी / यांच्या सुखद व्यवस्थापनासाठी / घरातील कर्ते झाडं व्यग्र असतात / आणि माणूस ? / माणसाचं नाव काढलं / तर मात्र सर्वांचेच चेहरे काळवंडतात / ते कत्तलीचे रणसंग्राम आठवत / लहानग्यांना त्यापासून दूर ठेवत / बाहेर खेळायला पाठवतात / आणि पाणावलेल्या कडांना पुसत / आत मजबूत असल्याचा इशारा देतात /...एका घरात ना फक्त झाडंच राहतात / माणसं राहत होते तसे..’ (शब्दांच्या पसाऱ्यातील अर्थाच्या आत्महत्या, पृ. ९१) प्रचलित व्यवस्था स्त्री-पुरुष व या द्विध्रुवापलीकडे जगणारे सर्व जीव, एकूणच मानवजात साशंकतेच्या आवर्तात आहे हे उपरोक्त कवितेतून प्रतिपादित केले आहे. भविष्यातले मानवी जीवन सखोल भावगर्भतेने आखत, त्याला वैश्विक परिमाण देत ‘झाड’ ही निसर्गप्रतिमा कवीने बोलकी करणे लक्षवेधी आहे. वर्तमानातील मानवी जीवनातल्या व्यथा, वेदना, दु:खे, दुर्बलता, असहायता, अतर्क्य शक्यतांपलीकडचे वर्तनव्यवहार कवितेच्या माध्यमांतून दर्शवले आहेत.
साधारणत: इ. स. २०१० नंतर आलेले कवितासंग्रह पाहता स्त्रीप्रश्न मांडताना आवाजी कवितेचा आवाहक स्वर निवला. संयतपणे लिहिताना स्त्री-मुक्ती चळवळ, स्त्रीवाद ही जीवनप्रणाली, विविध विद्यापीठांमध्ये असलेली स्त्री अभ्यास केंद्रे, समाजमाध्यमांचा वाढता प्रसार यांतून नवे पुरुषभान घडवण्याचे प्रयत्न झाले. त्या प्रयत्नांची नोंद मनाशी ठेवत योजना यादव लिहितात, ‘प्रलंयकारी भूकंपात / एकाच वेळी / संपणार नाही आपण / महापुरात वाहूनही / जाणार नाही / हातात हात धरून / माझ्यानंतर तुला / वा तुझ्यानंतर मला / जगावंच लागेल / काही काळ / तेव्हा आपण / आत-बाहेर / एकसारखे असू / पाळू पुन्हा / आपापल्या वृत्तीचा धर्म / तोवर / मर्म साहचर्याचं!’ (मरी मरी जाय सरीर, पृ. २०) स्त्री-मुक्ती चळवळीनंतर स्त्रियांचे प्रश्न सोडवताना केवळ स्त्रीभान जागृत होणे पुरेसे नाही तर स्त्रियांच्या साथीला नवभान जागृत असलेला पुरुष असणे ही अर्थवत्ता लक्षात घेतली जाऊ लागली. पुरुषाविषयीचा चढा सूर स्त्री-कवितेतून जसजसा निवळत गेला तसे स्वत:कडे केवळ स्त्री म्हणून पाहणेही थबकले. स्त्रीला तिचे व्यक्तिमत्त्व नाही, स्वत्व नाही ही बाब दृढ केली गेली होती. पुरुषसत्ताक व्यवस्थेने घडवलेली स्त्रीप्रतिमा हेदेखील स्त्रीदास्याचे मुख्य कारण होते. स्त्री जशी नाही तसे असण्याची जी चौकट तिच्यावर लादली गेली होती. भूतकाळ, इतिहास, संस्कृती यांतील स्त्रीची उदात्त किंवा अवमूल्यनात्मक तथाकथित प्रतिमा फसवी आहे, तिचे पुनर्वाचन करत मीनाक्षी पाटील लिहितात, ‘काहीच विशेष वाटत नाहीय मला / या आकार निराकाराच्या लढाईत / म्हणजे अगदीच नीट बघितलं तर / आकाराच्या बाहेरच असतो की निराकार / आणि लोक शोधताहेत, भांडताहेत, संपवताहेत एकमेकांना आकार / निराकाराच्या निकराच्या लढाईत.../ मी फेकूनच दिलीयत माझी शस्त्रं निराकाराच्या पोकळीत / आणि जरी दिला तुम्ही आकार तुमच्या भीतीला माझ्या शस्त्राचा / तरी मी स्वीकारणारच नाही तुमची भीती माझं शस्त्र म्हणून / मी धरणारच नाहीय शस्त्र / तुम्ही कितीही चाल करून आलात तरी / कारण मी भारावतच नाहीय कशाने / ना भीतच नाहीय कशाने / काहीच सिद्ध करायचं नाहीय मला / काहीच नकोय मला कुणाकडून / मला माहीतीय की / भरलीच जाणार नाहीय ही पोकळी / जी दिवसेंदिवस पावतेय प्रसरण / एकाच जन्मात मी घेतलेयत हजार जन्म / आणि हजार जन्मात घेतलेत अनंत जन्म / सगळं बघून अनुभवून झालंय माझं / हजारो वर्ष / आता मी फक्त 'आहे' / 'आहे.’ (ललद्यदस् ललबाय, पृ.१०५) मानवी जीव म्हणून नि:संग होत मुक्तीचा निर्भय प्रत्यय व त्याचा शांत, समंजस उद्गार मीनाक्षी पाटील यांच्या कवितेत उमटला आहे.
पुरुषसत्ताक मूल्ये स्त्रियांच्या वर्तणुकीवर, विचारांवर, भावनांवर अप्रत्यक्ष नियंत्रण ठेवतात. स्त्री-मुक्ती चळवळीला समांतर अशी लेखनचळवळ कवितेत आकाराला आलेली पाहता स्त्रियांची बंडखोरी जशी दिसते त्याला जोडून पुरुषसत्ताक मूल्यांच्या नियंत्रणाखाली किंवा त्या बंधनात असलेल्या स्त्रियांसाठी भगिनीभावाची भावनाही प्रबळ आहे. हा सार्वत्रिक भगिनीभाव “हे, / बिनचेहेऱ्याच्या बायांनो / आम्ही प्रार्थना करतोय / तुमच्यासाठी / जगातल्या सगळ्या / ओझी वाहणाऱ्या / डोक्याखालच्या / रिकाम्या कॅनव्हासवर / पसरोत नवे रंग.. / फुटोत नवे चेहरे.. / उमलून येवोत / कान, नाक, ओठ, / पाणीदार डोळे.. / ओठा ओठांवर / लगडून येवो शब्द / अन् एक नवी भाषा / स्वातंत्र्य, विद्रोह अन् / आत्मसन्मानाची...” (कथार्सिस, पृ. १९३) असा काव्यगत आशयात सारिका उबाळे ह्यांनी प्रार्थनारूपात मांडला आहे. स्त्रीप्रश्न करुणाभावाने हाताळण्यापेक्षा अस्मिताभावाच्या प्रगल्भतेने हाताळणे ही स्त्रीनिष्ठ भूमिका माया पंडित यांच्या ‘तल्खली’ या संग्रहात दिसून येते. व्यापक जीवनानुभवाच्या विस्तृत परीघात त्या लिहितात, ‘...गाऱ्हाणी सांगू नकोस. / नको मांडू कैफियतींचा बाजार. / धुंडू नकोस पराभवांचे अर्थ, वंचनांचे विषाद नि / दुखावल्याची खंत सांगू नकोस, / माजवू नकोस अवडंबर सलांचे, नको मागू प्रश्नांचे उत्तर / सोडून दे शंकांची मुजोरी. / उपेक्षेचे सल गाड समंजस ओळींमधून, समांतर हो. / मान झुकवून सामोरी जा दुःखाला, होऊन पारदर्शी संपूर्ण सोलीव. / पेरून घे अंगभर, अधीन हो दुःखाच्या. / वाहू दे रक्तात, धमन्यांत, स्नायूंच्या चिवट कणाकणात / उतून येऊ दे त्याच्या जहरजर्जर स्पर्शात / आजवर न जाणवलेल्या अर्थांचे आकार / ते ताणून घे. / वाहून आवेगांचे, दुःखाचे ओसरेल भान / श्रांत, विक्लांत तृप्तीत / रिघून जाऊ दे दुःखाचे पोरकेपण / आणि मग सोडवून घे गळ्याभोवतालची त्याची मरणमिठी हलकेच / रुतलेले पाऊल त्याचे तुझ्या देहात / सुटेल न सुटेल / हात दे त्याला / आणि ठेव त्याच्या डोळ्यांत / निळे आभाळ / ओठांवर त्याच्या पाखरांचे गाणे / आणि मग / अलिप्त हो.’ (तल्खली, पृ. १६) स्त्रीभाषेची शैलीविशिष्टता माया पंडित यांच्या संग्रहात विशेषत्वाने जाणवते. स्त्रियांना आत्मप्रत्यय घ्यायचा असेल तर त्यांनी स्वअस्तित्व शोधासाठी अनुभवांच्या आधारे स्वत:ची जडणघडण, जीवनविषयक दृष्टिकोण, त्यांच्या मूल्यकल्पना, जाणिवे-नेणिवेतले खरे जग या साऱ्यांचा पडताळा घ्यायला लागेल. त्या अनुषंगाने माया पंडित यांची प्रस्तुत काव्याभिव्यक्ती विलक्षण ठरते. त्या लिहितात, ‘माझ्या सुखाच्या आयाबायांनो / सुगराईने शिंपलेत माझ्या जिवाचे शिवार / राईभरही सुगावा लागू दिला नाहीत अंतरीच्या झळांचा / माझ्या रुजतेल्या मुळांना; / आणि धरलेत डोईवर तुमच्या / मायेचे आबदागीर. /...न ठेवता मनात कसली साकीबाकी कडूपणाची, / निखालस साजरे केलेत माझे चिमूटभर आभाळ / पाखरलीत जीवावर कायम मऊ सावल्यांची सोनसळ. / निभवलात बहीणपणाचा वसा आणि केलीत / जिण्याच्या अघोर प्रश्नांना सुहेल झेलीत / साठा उत्तरांची कहाणी / पाचा उत्तरी सुफळसंपूर्ण / ...मायमावल्यांनो, सायसावल्यांनो / तुमच्या संपूर्णपणे निर्हेतुक समवायांचे / तुमच्या सहोदर संजोगांचे / आणि पाठीवरून फिरलेल्या निरामय हातांचे. / माझ्या आख्ख्या जिण्याला कवळून राहिलेल्या / तुमच्या दशांगुळे उरलेल्या जिव्हाळ्यांचे. / खरेतर ठेवीन ऋण / हातचे म्हणून राखून / दुस्तर होईल जगणे जेव्हा आयुष्याच्या निसरत्या प्रवाहात / तेव्हा बांधून घालतील मला तुमच्या मुळांशी / जन्मजन्मांतरी / त्यांची चिवट लवचीक लव्हाळी.’ (तत्रैव, पृ. ८१-८२) स्त्रीच्या मानसिक व सांस्कृतिक जडणघडणीत पुरुषसत्ताक मूल्यांच्या प्रभावातून ज्या स्त्रीप्रतिमेचे उदात्तीकरण करून तिचे अप्रत्यक्ष निर्बलीकरण केले जाते त्याच्या अगदी उलट अशी आत्मप्रतिष्ठा उंचावणारी स्त्रीप्रतिमा उपरोक्त काव्यगत आशयात संरचित केल्याचे निदर्शनास येते. माणूस म्हणून जगण्याच्या नव्या शक्यतांचा, स्त्रीत्वाच्या सर्जकतेचा, भाषेचा, आविष्कारशैलीचा असा शोध ही परिवर्तनाची महत्त्वाची दिशा स्त्री-कवितेला गवसल्याचे वंदना भागवत यांच्या ‘गजबजलेला अवकाश’ या कवितासंग्रहातही दिसते. स्त्रीनिष्ठ गूढता, भाषिक वेगळेपण, कवितेचे दीर्घत्व, आकृतिबंधातले नाविन्य त्यात आहे. जसे की-‘दोन दगड एकमेकांना घासतात तेव्हा बरसतात / म्हणजे बाहेरचा थंडावा, काळोख नुसताच देखावा ? / आतमध्ये वेगळ्याच आकाशगंगांची आवर्तनं ? / आत मध्ये असणार चंद्र उदयता स्निग्ध / आतमध्ये नसणार अंधार / टेकडीमागून चंद्र अलगद वर येताना चांदणं विखरतं / आकाशगंगांच्या अगम्य लिप्या दृग्गोचर करतं/ तशी दगडाच्या आतही असणार / कालचित्रं, अगम्य आकाशगंगांशी संवादी / हातात घेऊन नेमका भिरकावल्यावर / विस्फोटत अग्निफुलांमधून विखरणारी...’ (गजबजलेला अवकाश, पृ. १०६ ) सार्वजनिक जीवनातल्या व्यापक अनुभवांचा आविष्कार व व्यामिश्र खासगी तपशील यांचे संश्लेषण ही ‘गजबजलेला अवकाश’ मधील कवितांची वेगळी अशी धाटणी आहे. राग, अन्यायाची भावना, तिरस्कृतता यांतला टोकदारपणा टाळून समाजव्यवस्थेच्या वैश्विक पुनर्बांधणीचा स्वर आळवत वंदना भागवत लिहितात, ‘...तर एकेकाळी आपण जंगलात हरवलो होतो / तेव्हा आपल्या आतल्या आदिम भयाला शरण गेलो / आणि फक्त एकमेकांनाच आधार मानून / एकमेकांशी जुगत राहिलो / मग जग भलत्याच कशाकशानं भरून टाकलं / तेव्हा / जंगल हरवून गेलं / आपल्या डेटाबेसमधून डिलीट मारल्यासारखं / आता नव्यानं सुरु करूयात हिरव्या तपशीलाच्या नोंदी ठेवणं? / त्या पालवतील अशा आशेनं / आपल्याच मनातल्या विखारी अणु उत्सर्जनाचा तडाखा कमी झाल्यावर / आणि पृथ्वीवर माया पांघरणाऱ्या ओझोनला ठिगळं लावल्यावर’ (तत्रैव, पृ.१०४) विचारांनी मुक्त स्त्रीमन पुरुषाचे असणे मान्य करते तरी त्या स्वीकारार्हतेला अपरिपूर्णतेच्या वेदनेची सूक्ष्म किनार आहे. स्त्रीच्या अंतर्विश्वाचा परिस्थितीसापेक्ष वेध घेता घेता कवी मानवी मनाच्या अनुषंगाने परिस्थितीनिरपेक्ष स्वतंत्र जगाचा वेगवेगळ्या अंगाने शोध घेत अखेर निर्भयपणे सहजीवनाची उदार दृष्टी सूचित करते.
इ. स. १९६० ते इ. स. १९७५ हा स्त्रीप्रश्नांची चर्चा सुरू करणारा काळ आहे. इ. स. १९७५ ते इ. स. २००० हा स्त्रियांच्या विविध आंदोलनांचा व स्त्रीमुक्तीसाठी कायदा, राजकारण, वाङ्मयनिर्मिती अशा त्रिविध आघाड्यांवर संघर्षप्रवणतेचा तथा स्त्रीअस्मितेसाठी कार्याच्या उभारणीचा काळ आहे. इ. स. २००० ते इ. स. २०२५ हा स्त्री-पुरुष व या द्विध्रुवात्मकते पलीकडे जगणारी सगळीच माणसे व्यक्तिभानाच्या, माणूसपणाच्या शोधात मुक्तीच्या असोशीने धडपडत आहेत, सर्वच भेदाभेदांपलीकडे जाऊन त्यांचे संघर्ष समजून घेण्याचा काळ आहे. उपरोक्त तीनही कालखंडातील स्त्री-कविता पाहता जीवनात घडणाऱ्या राजकीय व सामाजिक घडामोडींचा कवितेच्या निर्मितीशी काहीएक सांधा जुळल्याचे स्पष्ट दिसते. स्वातंत्र्याची प्रेरणा, स्त्री-मुक्ती चळवळीतील आंदोलनात्मक प्रवृत्ती, स्त्रियांनी घेतलेल्या भूमिका, त्यातील गर्भित मूल्ये यांचा स्त्री-कवींच्या अनुभवविश्वाशी, विचारांशी संवेदनात्मक पातळीवर संबंध आढळतो. स्त्रियांच्या मराठी कवितेतील धीट आशयचित्रणाचा उल्लेख केला जातो. वास्तविक पाहता कविता लिहिण्यासाठी धाडस लागते. ‘जे जे खासगी ते ते राजकीय’ म्हणत स्त्रियांनी अंतर्गृहातील व अंतर्मनातील सारेच व्यवहार कवितेत उघड केले आहेत. पुरुषसत्ताक व्यवस्थेवर आसूडाचे फटके ओढण्याचे परिणाम असतीलच ते दृश्य-अदृश्य आघात त्या-त्या स्त्री-कवींनी सोसले आहेत, तेही कवितेतूनच प्रसृत केले आहे. स्त्रीवादी जीवनचिंतन उभे करणे हे कवितेचे कार्य नाही, स्त्री-कवींनी जाणीवपूर्वक तो मुख्य हेतू बाळगून लिहिले असेही म्हणता येत नाही, तशी अपेक्षा पुढच्या काळासाठी करताही येणार नाही तथापि कालभान व युगजाणीव, स्त्रियांच्या चळवळी या पार्श्वभूमीवर कवितेतून स्त्रीवादी जाणिवांचे प्रकटीकरण झाले आहे, हे निदर्शनास येते. स्त्रियांची समकालीन मराठी कविता बहुतांशी विधानात्मक, प्रतिक्रियात्मक असल्याने अभिधेच्या पातळीवर आढळते. त्यामुळे कवितेतील अनेकार्थतेच्या शक्यता उणावतात. कवितेतून सर्वच स्त्री-प्रश्न गांभीर्याने अभिव्यक्त झाले, असे म्हणता येत नाही. कवीचे अनुभवविश्व व बाह्य परिस्थिती यामधले द्वैत लोपले अशा घटनाप्रधान कविताही उपरोक्त कालखंडात लिहिल्या गेल्या आहेत. क्वचित त्यात कृतक दु:खभावही जाणवतो. आखीवरेखीव बेतलेली कविताही त्यातल्या कृत्रिमतेमुळे प्रसंगी बोचते. समाजसंरचित पारंपरिक नीतिकल्पनांचे जोखड झुगारून देताना कवितेतले आक्रस्ताळेपण कधीतरी नकोसेही वाटते तथापि स्त्रीत्वाच्या सांस्कृतिक रचिताला हादरे देण्याचे प्रयत्न दखलपात्र ठरतात. स्त्रीवादी विचारव्यूह परिचित असेल तर शब्दरचनेच्या बाबतीत अधिक संवेदनशील असणे अभिप्रेत होते, त्याऐवजी तो विचारव्यूह विद्रोह, बंडखोरी, शोषण, आक्रोश असाच रुजत राहिला आहे; त्याचाही पुनर्विचार झाला पाहिजे. अल्पाक्षरी मितव्ययी व्यंगार्थप्रधान कविता, आशय व आकृतिबंध यांतील प्रयोगशीलता वाढली पाहिजे. काव्यगत आशयातील तगमग, आक्रोश, बंडखोरी हे एका टप्प्यावर मान्यही केले तरी आतल्या शांततेसाठी कविता हादेखील विचार होणे गरजेचे आहे. कवितेचे आत्मनिष्ठ असणे मान्य केले तरी आत्यंतिक आत्मकेंद्री व व्यक्तिवादी लेखनाबाबतचे संभाव्य धोके लक्षात घेतले पाहिजेत. स्त्री-कवितेपुढे समकाळातही अनेक आव्हाने आहेत. प्रस्तुत लेखात उल्लेखित स्त्री-कवी, कवितासंग्रह व काही कविता पाहता समाजव्यवस्थेतील परिवर्तनासाठी त्यांचे लेखन काही हालचाल निर्माण करून विचारप्रवृत्त करते. अस्वस्थतेतून विधायकतेच्या दिशेने कवितागत आशयाची वाटचाल दर्शवता येते. स्त्री-मुक्ती चळवळीला समांतर अशी लेखन चळवळ मराठी स्त्री-कवितेत आकाराला आल्याचे म्हणता येते.
डॉ. सरिता सोमाणी, पुणे.
(संदर्भासाठी खालील मोबाईल किंवा मेलवर संपर्क करावा.) मो. ८२७५९४५७९२
sarita.darak2050@gmail.com