जागतिक महिला वर्षाच्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीत स्त्री चळवळीचं योगदान .....
यूनोनं १९७५ हे वर्ष जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केलं त्याला २०२५ मध्ये पन्नास वर्ष पूर्ण होतील, त्यानिमित्त १९७५ ते २०२५ या ५० वर्षात महिलांसंदर्भात सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय, कायदे, कला, क्रीडा, आरोग्य, शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, शेती, पर्यावरण, उद्योग आदी क्षेत्रात विशेषतः महाराष्ट्रात काय काय महत्वाच्या ठळक घटना, घडामोडी झाल्या त्याचा सामान्य स्त्री, पुरुष आणि एल.जी.बी.टी.आय.क्यू.प्लस या सर्वांवर काय परिणाम झाला याचा सखोल आणि सम्यक वेध घेणारा व्यापक अभ्यास विद्या बाळ अध्यासन प्रकल्प २ अंतर्गत मिळून साऱ्याजणी मासिक हाती घेत आहे.
या प्रकल्पामध्ये सामान्य माणस केंद्रस्थानी असणार आहेत. त्यामुळे पितृसत्ताक पुरुषप्रधान व्यवस्था म्हणजे काय? तसंच या व्यवस्थेत स्त्री प्रश्न म्हणजे काय, व्यवहारात त्याचं रूप कस आहे? स्त्री प्रश्न सोडवण्यात स्त्री चळवळ, स्त्री अभ्यासानं कसा हातभार लावला असं त्यांना वाटतं? मुळात स्त्री चळवळ, स्त्री अभ्यास त्यांच्या पर्यंत पोहोचला आहे का? या व्यवस्थेत स्त्री प्रश्नाची दुसरी बाजू म्हणजे पुरुष प्रश्न आहे याविषयी त्यांना काय वाटत? इत्यादी इत्यादी अनेक प्रश्न असतील मध्यम, उच्च मध्यम, निम्न मध्यम वर्गातले ग्रामीण आणि शहरी भागातले तसेच ज्येष्ठ मध्यमवयीन आणि तरुण अशा सर्व स्तरांतले स्त्री, पुरुष आणि एल.जी.बी.टी.आय.क्यू.प्लस यांच्याकडून सविस्तर प्रश्नावली भरून घेणे हा एक फार मोठा महत्त्वाचा भाग हा प्रकल्प व्यापणार आहे. प्रश्नावली भरून झाल्यावर पुढील टप्प्यात प्रश्नावली मधील आशयाचे विश्लेषण अनुभवी कार्यकर्ते, स्त्री चळवळीचे अभ्यासक आणि तज्ञ मंडळीकडून केलं जाईल. ते वेबसाईटवर सर्वांसाठी उपलब्ध असेल.
विभाग एक : खुला लोकसंवाद - स्त्री चळवळ आणि मी.
स्वातंत्र्य, समता, मैत्रभाव आणि सामाजिक न्यायाच्या विचारांच्या बिया दोन्ही हातांनी जमतील तिथं आणि जमतील तशा टाकत रहाणं महत्त्वाचं आहे, असं साऱ्याजणीला वाटतं. कारण स्त्री चळवळीचा डोलारा या मूल्यांवर उभा आहे. सामान्य माणसांच्या शहाणपणावर सद्भावावर साऱ्याजणीचा विश्वास आहे. मात्र सद्य परिस्थितीत सामान्य माणसांच्या सद्भावनेवर जात धर्मांच्या अस्मितेच्या नावाखाली विद्वेषाचा गहिरा झाकोळ पसरला आहे. तो दूर करण्यासाठी मनामनांमध्ये समंजस संवादाची तातडीची गरज निर्माण झाली आहे म्हणून साऱ्याजणी खुला लोकसंवाद करू इच्छिते स्त्री चळवळीच्या योगदानाविषयी माणसा माणसांमध्ये दिल से संवाद होणं महत्त्वाचं आहे. संवादाचं माध्यम त्यामानानं गौण आहे.
स्त्री चळवळ आणि मी या संदर्भात खुला लोकसंवाद करण्यासाठी मुख्य माध्यम विविध स्तरांतील लोकांसाठी त्यांना आपले वाटतील असे प्रश्न असणारी प्रश्नावली हे आहे. ही प्रश्नावली विविध स्तरांवरील लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम साऱ्याजणीच्या ऑफिसमधून किंवा साऱ्याजणीच्या गावोगावी असणाऱ्या प्रतिनिधींच्या आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पोहचवली जाईल. नंतर ही प्रश्नावली ते स्वतः त्याची उत्तर लिहून भरून पाठवतील किंवा कार्यकर्त्याबरोबर संवाद साधत भरून देतील. छापील माध्यमातून, ऑडिओ क्लिप द्वारा किंवा गुगल फॉर्म च्या माध्यमातूनही या प्रश्नावली साऱ्याजणी पर्यंत पोहोचतील प्रश्नावली मधून मिळालेल्या आशय आणि माहितीच विश्लेषण तज्ञ मंडळी, अभ्यासक, स्त्री चळवळीतले अनुभवी कार्यकर्ते आदींच्या सहाय्याने केलं जाईल. अध्यासन प्रकल्प दोन हा त्या अर्थानं शास्त्रोक्त संशोधन प्रकल्प नाही त्यामळे शास्त्र शुद्ध पणे संशोधन पद्धती शास्त्राचा काटेकोर पणे अवलंब यात केलेला नसेल. हे विश्लेषणात्मक लेख मिळून साऱ्याजणी मासिकाच्या मिसा online या द्विभाषिक (इंग्रजी अधिक मराठी) वर प्रकाशित केले जातील.
विभाग दोन: विविध क्षेत्रातलं स्त्री चळवळीचं योगदान.
१९७५ ते २०२५ या पन्नास वर्षात महिलांच्या संदर्भात सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, कायदे, साहित्य, कला, क्रीडा, आरोग्य, शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग, शेती, पर्यावरण इत्यादी क्षेत्रात विशेषतः महाराष्ट्रात काय काय महत्त्वाच्या घटना घडामोडी झाल्या? काय प्रकारची धोरणं नव्यानं आली आणि ती कशी राबवली गेली? त्याचा सामान्य स्त्री, पुरुष आणि एल.जी.बी.टी.आय.क्यू.प्लस अशा सर्वांवर काय परिणाम झाला याचा सखोल आणि सम्यक वेध घेणारा व्यापक अभ्यास या विभागात होईल. वर उल्लेख केलेल्या क्षेत्रांमध्ये असंख्य संस्था, संघटना, अभ्यासक आणि विषयतज्ञ गेली अनेक वर्ष विविध स्तरांवर काम आणि सखोल अभ्यास करत आहेत. त्यांनी केलेल्या अभ्यासाविषयी स्त्रीवादी परिप्रेक्ष्यातून बघणं त्यांच्या अभ्यासातून काढलेल्या निष्कर्षाचा धांडोळा इथे अपेक्षित आहे. नव्यानं अभ्यास करणं अपेक्षित नाही. म्हणजे नेटवर्किंगचं मुख्य काम १९७५ नंतरच्या स्त्री चळवळीच्या पन्नाशीत साऱ्याजणी करू इच्छिते.
मिळून साऱ्याजणी मासिकाच्या ऑगस्ट अंकात विद्या बाळ अध्यासन प्रकल्प २ मध्ये सहभागी होण्यासंदर्भात केलेल्या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळाला. ८० ९० व्यक्तींनी उत्साहानं यात सहभागी होण्यासाठी नाव नोंदवली आहेत. अजूनही नव्यानं नावं नोंदवली जात आहेत. महाराष्ट्रातील, महाराष्ट्राच्या बाहेरचे तसंच भारताबाहेरच्या मंडळींचा यात समावेश आहे. सहभागी मंडळी विविध क्षेत्रातले अभ्यासक, उच्चशिक्षित तज्ञ आहेत, तसेच चळवळीतले कार्यकर्ते, नेते आहेत. नोकरदार व्यावसायिकांबरोबरच गृहिणीचे योगदानही यात असणार आहे. ज्ञाननिर्मितीच्या लोकशाहीकरणावर साऱ्याजणीचा विश्वास आहे. अनुभव आणि सिद्धांत यामध्ये द्वैतभाव नसून ते हातात हात घालून जातात असं साऱ्याजणी मानतं. या अभ्यासाचा भाग म्हणून वर उल्लेख केलेल्या क्षेत्रात काम करणाऱ्या महाराष्ट्रातल्या प्रमुख सामाजिक संस्था, संघटना, विविध आंदोलनं, चळवळी यांची एक व्यापक सूचीही या निमित्तानं तयार केली जाईल. तसंच अनेक पुस्तकं ज्यामध्ये विविध क्षेत्रात स्त्री चळवळीच्या योगदानासंबंधात आशय आहे, स्त्रियांच्या कर्तबगारीची नोंद आहे अशा पुस्तकांची संदर्भसूचीही तयार केली जाईल.
विभाग दोन मध्ये त्या त्या क्षेत्रात स्त्रियांच्या यशापयशाचा लेखाजोखा घेणारा आणि त्याची मीमांसा करणारा अभ्यास असेल. यासाठी त्या त्या विषयातल्या तज्ञांचं कार्यकारी मंडळ असेल प्रत्येक विषयासाठी एक समन्वयक असेल तो/ती त्या विभागाचे उपविभाग करून एक समिती स्थापन करेल त्यात अभ्यासक असतील. सर्व समन्वयकांचा समन्वय करण्यासाठी प्रमुख समन्वयक असेल. तसंच विविध विषयातल्या तज्ञांचं एक सल्लागार मंडळ असेल, विविध क्षेत्रात काम करणारे अभ्यासक आणि कार्यकर्तेही या विभागात असतील.
आत्ताच्या बाजारी, पैसाकेंद्री युगात आर्थिक सहाय्य नसताना विद्या बाळ अध्यासन प्रकल्प - 2 राबवणं फार जिकिरीचं आहे आणि साऱ्याजणीचा जीव छोटा आहे याची आम्हाला नम्र जाणीव आहे. मात्र साऱ्याजणीच्या संस्थापक संपादक स्मृतीशेष विद्या बाळ म्हणत तसं साऱ्याजणीकडे आर्थिक बळ फार नाही मात्र साऱ्याजणीवर प्रेम करणाऱ्यांचं मोठं भांडवल आमच्या गाठीशी आहे. या संचिताच्या बळावर तुम्हा सर्वाच्या साथीनं हा प्रकल्प सुरू करण्याचं धाडस केलं आहे. ती, ते आणि तो यांचा स्वतःशी आणि परस्परांशी नव्यानं संवाद होण्यासाठी... मासिक नव्हे चळवळ ! या. मासिकाच्या ब्रीद वाक्याशी इमान राखून हा प्रकल्प ही एक चळवळ आहे, हे लक्षात घेऊ या. आता हा प्रकल्प शिस्तशीरपणे पुढे नेत राहू या. ही स्मृतीशेष विद्या बाळ यांच्या तेजस्वी कार्याला आदरांजली असेल!
साधारणपणे हा सर्व अभ्यास विद्या बाळ स्मृती दिनी ३० जानेवारी २०२५ पर्यंत लिहून पूर्ण व्हावा अशी अपेक्षा आहे. त्यानंतर त्यावर फायनल हात फिरून ८ मार्च २०२५ रोजी तो लोकांपर्यंत ऑनलाईन पोहोचावा असा प्रयत्न आपण सर्व मिळून करू या. या प्रकल्पाला आर्थिक साहाय्य मिळाल्यास छापील माध्यमातही हा अभ्यास प्रकाशित करण्याची इच्छा आहे. त्यासाठी आर्थिक निधी उभारण्यास मदत करावी, असं आवाहन करत आहोत.
स्त्री चळवळ जिंदाबाद जिंदाबाद !!
आपली विश्वासू,
गीताली वि. मं.
संपादक, मिळून साऱ्याजणी
स्त्री चळवळीचा विविध क्षेत्रांवर प्रभाव
प्रकल्प-२ (१९७५-२०२५) दिशादर्शक सत्र
२०२५ हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष जाहीर होण्याचे सुवर्णमहोत्सवी वर्ष असेल. त्या निमित्त विद्या बाळ अध्यासन केंद्रातर्फे एक मोठा अभ्यास प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाचे दोन भाग करण्यात आले आहेत. प्रकल्प १ मध्ये -----.
प्रकल्प २ मध्ये गेल्या पन्नास वर्षात देशात व परदेशातही स्त्री चळवळीने जी वेगवेगळी वळणे घेतली, जे साहित्य निर्माण केले, विविध माध्यमांद्वारे जे विचार व्यक्त केले गेले त्याचा महाराष्ट्र राज्यात विविध क्षेत्रांवर काय परिणाम दिसून येत आहे, याचा सखोल आढावा घेण्याचे योजिले आहे.
या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी स्वयंस्फूर्तीने अनेक क्षेत्रांमधून विभिन्न पार्श्वभूमी असणाऱ्या अनेक व्यक्ती पुढे आल्या आहेत. या सर्वांमध्ये प्रकल्पाविषयी आस्था आणि त्यासाठी आवश्यक ते योगदान देण्याची तळमळ या दोन सामायिक बाबी सोडल्या, तर इतर अनेक बाबतींत, उदाहरणार्थ, शिक्षण, नोकरी, अभ्यासाचे आणि जिव्हाळ्याचे विषय, विचारधारा, वैयक्तिक छंद आणि कौशल्ये, वास्तव्याचे ठिकाण, वय यांमध्ये कमालीचे वैविध्य आहे. काही जण अनेक वर्षांपासून स्त्री चळवळीत सक्रिय आहेत, काही स्त्रीवादाच्या अभ्यासक आहेत, काही केवळ स्त्रीमुक्तिवादाविषयी कुतूहल वाटते, व ते अधिक जाणून घेऊन प्रकल्पात सहभागी व्हावे या तारुण्यसुलभ उत्साहाने सामील झाले आहेत. काही व्यक्ती आपापल्या क्षेत्रांत जबाबदारीची कामे करत आहेत, परंतु त्यांचा चळवळीशी थेटपणे कृतिशील संबंधही आलेला नाही, आणि या आधी त्यांनी स्त्रीमुक्तिवाद जाणून घेण्याचा सजग प्रयत्नही केलेला नाही. (त्या स्त्री चळवळीच्या लाभधारक आहेत असे मात्र आपण निश्चितपणे म्हणू शकतो.)
इतक्या वैविध्यपूर्ण समूहास (सुमारे १०० स्वयंसेवक) एका सामायिक उद्दिष्टास जोडून घ्यायचे तर सर्वांचे प्रकल्पाच्या स्वरूपाविषयी किमान काही दिशादर्शन करणे अत्यावश्यक होते. विशेषत: ‘स्त्री चळवळीचा प्रभाव’ म्हणजे नक्की काय, या प्रभावाचे किती पैलू असू शकतात याविषयी एक समान जाणीव निर्माण करणे गरजेचे होते. सर्वांना स्त्री चळवळीचे म्हणणे आणि तिच्या मागण्या काय राहिल्या आहेत, पन्नास वर्षांत त्यांत कसकसे बदल होत गेले याची किमान माहिती करून देणे अपरिहार्य होते. याच उद्देशाने ८ ऑक्टोबर, २०२३ रोजी पुणे येथे एक दिशादर्शन सत्र (ओरिएन्टेशन सेशन) घेण्यात आले. त्याचे फेसबुक लाइव्ह प्रसारणही करण्यात आले, जेणेकरून काही जण त्यास ऑनलाइन उपस्थित राहू शकले.
या सत्रात ‘स्त्री चळवळीचा प्रभाव’ म्हणजे नक्की काय अभिप्रेत आहे, यावर विस्ताराने चर्चा झाली. मुद्दे स्पष्ट होण्यासाठी दैनंदिन जीवनातील अनेक उदाहरणे देण्यात आली. प्रसंगी, सहभागींनी स्वत:च्या अनुभवांमधून चळवळीच्या प्रभावाचे दाखले सादर केले. त्या सत्रातील ठळक मुद्दे सदर लेखात उद्धृत करत आहोत. प्रकल्प-२ मध्ये सहभागी झालेल्या सर्वांनी कृपया या लेखाची एक प्रत स्वत:कडे संदर्भासाठी ठेवावी, ज्या योगे प्रत्यक्ष काम सुरु केल्यावर सर्वांचे काम समान दिशेने पुढे जाईल.
स्त्री चळवळीच्या प्रभावाचे लक्षात घेण्याजोगे पैलू
भाग १ – बदलत्या जाणिवा
भाग २- जाणीवपूर्वक अध्ययन-चिंतन-लेखन
भाग ३- बदलांसाठी कृतिशील आग्रह
भाग ४- स्त्रीवादी विचारांच्या विरोधात एकजूट (बॅकलॅश)
भाग ५- स्त्री सक्षमीकरणाचे आनुषंगिक परिणाम
भाग १ – बदलत्या जाणिवा
स्त्रीचे दुय्यमत्व नैसर्गिक नसून पुरुषसत्ताक यंत्रणेचा परिणाम आहे, अशी मांडणी स्त्रीमुक्तिवादाच्या आरंभीच्या नेत्यांनी सुरू केल्यानंतर स्त्रियांच्या ‘स्व’ विषयीच्या जाणिवा बदलू लागल्या आणि त्या स्वत:च्या सहजप्रवृत्तीनुसार जगण्याचा प्रयत्न करू लागल्या. कालांतराने समाजाच्याही स्त्रीविषयक जाणिवांमध्ये बदल होऊ लागला.
बदलत्या जाणिवा हीच बदलत्या स्त्रीविषयक वास्तवामागची मुख्य प्रेरणा असल्याने जाणिवा बदलल्या म्हणजे नक्की काय याविषयी सुस्पष्टता असणे गरजेचे आहे. तसेच, सदर उपक्रम राबवताना या जाणिवांचे प्रतिबिंब आपण निवडलेल्या क्षेत्रात कसे उमटत आहे, यांचा वेध घेणे जरुरीचे आहे.
स्त्रीच्या आणि पर्यायाने समाजाच्या स्त्रीविषयक जाणिवा बदलल्या याचा अर्थ :
स्वत:ला काय वाटते, काय हवे, याचा स्त्रिया स्वत:शी धांडोळा घेऊ लागल्या
स्वत:च्या आशा-आकांक्षा आणि सल/अडचणी यांबाबत व्यक्त होऊ लागल्या
स्त्रीच्या अस्तित्वाची/योगदानाची दखल घेतली पाहिजे, असा आग्रह धरू लागल्या
स्त्रीच्या श्रमांची मोजदाद व्हायला हवी व त्यांचा आदर व्हायला हवा हा विचार बळावला .
स्त्रीविषयक प्रचलित समज, अपेक्षा यांना स्त्रिया आव्हान देऊ लागल्या
स्त्री-पुरुषांसाठी नीतीमत्तेचे वेगळे निकष असतात हे दाखवून देऊन त्यातील दुतोंडीपणा आणि चलाखी यांविषयी बोलू लागल्या
पुरुषश्रेष्ठत्व हे पुरुषाने दांभिकपणा करून प्रस्थापित केलेले मिथक आहे याची जाणीव झाल्याने त्यास आव्हान देऊ लागल्या (हे आव्हान केवळ स्त्रियांनीच दिले असे नाही, तर समन्यायी वृत्तीच्या पुरुषांनीसुद्धा दिले)
समाजाची मूल्यव्यवस्था पुरुषकेंद्री आहे असे म्हणून आवश्यक तेथे ती झुगारून देऊ लागल्या
वरील जाणिवा जागृत झाल्याच्या परिणामी:
स्त्रियांच्या आत्मचरित्रांची लाट आली
संततिनियमनाचे महत्त्व त्यांना कळले
स्त्रिया शिक्षण, अर्थार्जन, विविध क्षेत्रांत प्रवेश करण्याची स्वप्नं बघू लागल्या व ती पूर्ण करण्याचा त्यांना हक्क आहे, असं म्हणू लागल्या
वरील जाणीव जागृतीचे पडसाद साहित्य, नाट्य, चित्रपट, मालिका यांमध्ये पडू लागले. (उदा: इंग्लिश विंग्लिश सारखे सिनेमे, अनुजात सिंधू विनायल या नववीतील मुलाने काढलेले आईच्या विनावेतन कामांचे चित्र इत्यादी)
कायदे बदलले.
मुलाच्या पूर्ण नावात आईचे नाव अंतर्भूत झाले.
घराची नोंदणी करताना पत्नीचे नाव सेकंड ओनर म्हणून आपोआप चढू लागले.
राज्याचे महिला धोरण जाहीर झाले, त्यात स्त्रीला कुटुंब प्रमुख म्हणून नोंदणी करण्याचा अधिकार मिळाला.
समान शिक्षणाची मागणी व शासन दरबारी स्त्री शिक्षणाच्या सोयींचा आग्रह होऊ लागल्याने यंत्रणेत व प्रशासनात बदल झाले (छोट्या गावांमध्ये शाळेच्या वेळेत शाळेपर्यंत एस.टी. च्या दोन तरी फेऱ्या अनिवार्य वगैरे)
नाटक, दूरदर्शन मालिका व चित्रपटांमधून पुरुषश्रेष्ठत्वास आव्हान व्यक्त होऊ लागले. (त्याच वेळी स्त्रिया शिकूनसुध्दा आदर्श स्त्रीचे परंपरागत गुण विसरलेल्या नाहीत, व तेच कसे योग्य आहे, हे ठसवणाऱ्या कलाकृतींची निर्मिती)
भाग २- जाणीवपूर्वक अध्ययन-चिंतन-लेखन
स्त्रीचे दुय्यमत्व जनमानसावर ठसवण्यासाठी धर्मग्रंथ या सर्वांत प्रभावी प्रसारमाध्यमाचा वापर केला जातो याची जाणीव झाल्याने स्त्रियांकरवी प्रखर धर्मचिकित्सा. त्याचे ललित साहित्यात व स्त्रीच्या भावजीवनात पडसाद
याच चिकित्सेचा भाग म्हणून आदिम संस्कृतीतील स्त्री दैवतांवर अभ्यास करून ते समाजापुढे आणण्याचा प्रयत्न (तारा भवाळकर आदींचे अभ्यास)
शतकानुशतकांच्या पुरुषप्रधानतेमुळे स्त्रियांमध्ये निर्माण झालेल्या अवगुणांची चिकित्सा. हे अवगुण नैसर्गिक नसून त्यांची मुळं तिला नाकारलेल्या शिक्षण, संचारस्वातंत्र्य, अभिव्यक्तीस्वातंत्र्य, चूल-मूल या लादलेल्या परिघात आहेत असा जोरकस प्रचार. याची सुरुवात ताराबाई शिंदे, महात्मा फुले यांनी केली खरी, पण मराठीत त्यानंतर बरेच वर्षे शुकशुकाट होता. आंतरराष्ट्रीय महिला वर्षाच्या घोषणेनंतर पुन्हा काही काम होऊ लागले.
स्त्रीची लैंगिकता हा पुरुषसत्ताक राजकारणात खेळायचा हुकुमी एक्का कसा आहे, हे दाखवून देणारे अनेक अभ्यास सुरु. अलीकडे हा विषय वेब सिरीज , चित्रपट यांमधून मांडला जाऊ लागला आहे.)
यातूनच स्त्रीवाद या नव्या ज्ञानशाखेचा विकास आणि विविध प्रकारच्या अभ्यासांचा महापूर
भाग ३- बदलांसाठी कृतिशील आग्रह
स्त्रियांच्या गरजा, अडचणी, इच्छा आणि मतं मांडण्यास सर्व माध्यमांमधून सुरुवात. (‘ज्यूस’ सारखे लघुपट). त्यामागे ‘विमेन मॅटर’ ही भावना. आंतरराष्ट्रीय महिला परिषदांचे आयोजन)
या जगाची रचना पुरुषांनी, पुरुषांच्या दृष्टीकोनातून आणि पुरुषांच्या सोयी विचारात घेऊन केली आहे, हे स्त्रियांना जाणवू लागले व त्यामुळे विविध यंत्रणा कशा पुरुष धार्जिण्या आहेत याचा प्रचंड प्रमाणावर जगभर अभ्यास सुरु होऊन त्यातूनच यंत्रणा स्त्री-स्नेहल असल्या पाहिजेत असा आग्रह सुरु, त्यासाठी कायदे बदलण्याचे प्रयत्न.
स्त्रिया शिकू लागल्या, बोलू लागल्या, विरोध करू लागल्या, आपल्या अस्तित्वाची दखल घेण्यास भाग पाडू लागल्या, जगाच्या संरचनेत सहभागी होऊ लागल्या व त्यामुळे जगाचा चेहरा आमूलाग्र बदलू लागला. कायदे, साहित्य, कला, धर्माचरण, रूढी-परंपरा यांचे स्वरूप पालटण्यास सुरुवात.
भाग ४- स्त्रीवादी विचारांच्या विरोधात एकजूट (बॅकलॅश)
वरील सर्व व्यवहारांवर प्रतिक्रिया म्हणून स्त्रीस्वातंत्र्य विरोधी युक्तिवाद, साहित्य, चित्रपट आदींना बहर
स्त्रीचा वावर प्रत्येक क्षेत्रात असणार आहे, हे वास्तव स्वीकारणे समाजाला, यंत्रणेला गरजेचे झाले. कोर्पोरेट क्षेत्रात स्त्री-स्नेहल वातावरण ठेवणे कायद्याने बंधनकारक झाले. तो व्याप वाचवा म्हणून छोट्या आस्थापनांमध्ये स्त्रियांना न घेणे, त्यांची संख्या कमी ठेवणे अशा पळवाटा सुरु झाल्या. जेथे त्यास विरोध होतो, तेथे संघर्ष अटळ होऊ लागला.
‘मी टू’ सारख्या चळवळी सुरु झाल्या. त्यांवर प्रतिक्रिया म्हणून खाजगी उपक्रमांमध्ये ‘मुली नकोच’ ही वृत्ती दिसू लागली.
भाग ५- स्त्री सक्षमीकरणाचे आनुषंगिक परिणाम
स्त्रीचा दृष्टिकोन, विचारपद्धती, कलात्मक जाणिवा, जिव्हाळ्याचे विषय यांना स्थान आणि प्रतिष्ठा मिळू लागली. त्याच वेळी नवजागृत स्त्रीच्या इच्छा, हौशी यांचे मार्केटिंग करणारे व्यवसाय भरभराटीला आले व त्यामुळे पुनश्च स्त्रिया बाह्य सौदर्य, प्रसाधनं, दागिने, कपडे, झिरो फिगर या चक्रात मोठ्या प्रमाणात अडकू लागल्या. हा सापळा आहे, हे फार थोड्यांच्या लक्षात आले, परंतु या सापळ्यातून आर्थिक स्वातंत्र्य मिळवणाऱ्या स्त्रियाही मोठ्या संख्येने आहेत. स्त्री चळवळीचा आनुषंगिक परिणाम म्हणून असे अनेक विरोधाभास उगम पावले.
प्रत्येक ज्ञानक्षेत्रातील केवळ आणि केवळ पुरुषाच्या दृष्टिकोनातून तयार झालेली गृहीतकं आणि निष्कर्ष कसे एकांगी आणि अर्धसत्य सांगणारे आहेत, याचे अभ्यास बाहेर येऊ लागले व त्यांनी स्त्रियांच्या दृष्टिकोनातून दिसणारे वास्तव पुढे आणल्याने प्रत्येक क्षेत्र अधिक परिपूर्ण होऊ लागले. वैद्यकापासून ते स्थापत्यापर्यंत आणि जीवशास्त्रापासून ते इंडस्ट्रीअल डिझाईनपर्यंत प्रत्येक क्षेत्रास स्त्रीच्या गुणवैशिष्ट्यांची दखल घेणे अनिवार्य झाले.
माध्यमं, कला आणि साहित्य निर्मिती, विज्ञान संशोधन यांमध्ये स्त्रियांचा सहभाग वाढल्याने जगाचे चित्रण करण्यातील पुरुषकेंद्रीत्व कमी झाले. (उदा: मानववंशशास्त्रातील प्रचलित मांडणीस आव्हान). सत्तेतील असमतोल थोडा का होईना कमी झाला.
निवडणुकीय राजकारणात मतदार म्हणून स्त्रिया सत्ताकारणास वेगळे वळण लावण्याच्या शक्यता निर्माण झाल्या. त्यांची दखल घेणे सत्ताधाऱ्यांना भाग पडू लागले.
स्त्री चळवळीच्या प्रभावाने प्रेरित होऊन इतर वंचित समूह जागृत झाले व त्यांना स्त्री चळवळीने समर्थन दिले. त्यामुळे हे जग अधिक संवेदनक्षम आणि थोडे समन्यायी होण्यास सुरुवात झाली.
त्याच वेळी शतकानुशतके उपभोगलेल्या अनिर्बंध सत्तेत वाटेकरी आले, आपल्या खऱ्या-खोट्या श्रेष्ठत्वाविषयी शंका घेतली जाऊ लागली, आपल्या युक्तिवादास आव्हान मिळू लागले म्हणून सर्वच प्रकारचे सत्ताधारी अस्वस्थ झाले. पारंपरिक मूल्यव्यवस्थेस विरोध होतोय आणि नवी मूल्यव्यवस्था पचनी पडत नाही या दुविधेमुळे व्यक्तिगत पातळीवर प्रचंड अस्वस्थता, भांबावलेपण आले. (ते स्त्री-पुरुष, सवर्ण-अनुसूचित अशा सर्वांनाच आले.) त्याचे पडसाद विवाह आणि कुटुंब या दोन संस्थांवर पडले. व ते ललित कलांमध्ये प्रतिबिंबित होऊ लागले.
जुन्या मूल्यव्यवस्थेतील हिणकस कोणते व शास्वत काय हा नीरक्षीर विवेक जेथे कमी पडला, तेथे व्यक्तिगत पातळीवर संभ्रमावस्था, दु:ख, चळवळीची ढाल वापरून चुकीच्या गोष्टींचे समर्थन, समोरच्यावर अन्याय ही दुरिते दिसू लागली. त्याचा गंभीर परिणाम नातेसंबंधांवर पडल्याने सामाजिक पातळीवर खळबळ माजली. त्याचे पडसाद प्रत्येक सांस्कृतिक अंगावर दिसू लागले.
स्त्रीच्या लैंगिकतेवरची बंधने कमी होऊ लागल्याने एका बाजूला ते निरामय होण्याची शक्यता वाढली, तर दुसऱ्या बाजूला लैंगिक स्वातंत्र्यामधूनसुध्दा स्त्रीचे वैयक्तिक प्रश्न गंभीर होऊ लागले.
स्त्री दास्यातून सुटका करू बघणारी स्त्री अनेक बाबींमध्ये पुरुषाचे अनुकरण करू लागली.
कर्तृत्वाचे पुरुषी प्रारूप (मॉडेल) प्रचलित असल्याने स्त्रिया पुरुषी कार्यपद्धती अवलंबू लागल्या. यशाचे पुरुषांचे निकष ग्राह्य मानून जे जे परंपरेने स्त्रीचे असते, ते कमअस्सल, असा ग्रह रुजू लागला.
स्त्री चळवळीमुळे समान संधी, समान प्रतिष्ठा, समन्याय, सर्वसमावेशकता ही मूल्ये व्यवहारात उतरवणे बंधनकारक होऊ लागले. (आपल्या देशात स्त्रियांसाठी आरक्षण, सार्वजनिक जागांमध्ये स्त्रियांसाठी स्वच्छतागृहे, स्तनदा मतांसाठी स्वतंत्र कक्ष वगैरे रचनात्मक बदल, आस्थापनांमध्ये संचालक मंडळावर स्त्री सदस्य सक्तीचे इत्यादी बदल)
वेशभूषेपासून ते धर्माचरणापर्यंत स्त्री सन्मान आणि स्त्रीची सोय यांचा विचार ऐरणीवर आला. त्याचे प्रतिबिंब वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात दिसू लागले.
स्त्री चळवळीच्या युक्तिवादांत खूप तथ्य आहे, हे लक्षात आल्यानेच शाश्वत विकासाच्या आराखड्यात स्त्री चळवळीच्या अनेक मागण्या अंतर्भूत झाल्या.
स्त्रीवादी परराष्ट्र धोरण हा एक नवा पैलू विकसित होऊ लागला. प्रत्येक राष्ट्राची अंतर्गत धोरणे, नियम काहीही असो, परराष्ट्रातील स्त्रियांच्या मानवी अधिकारांचे जतन त्यांनी केलेच पाहिजे, असा आग्रह सुरु झाला.
स्त्री चळवळीमुळे समाजात घडून आलेले बदल बहुआयामी आहेत. प्रत्यक्ष सत्रामध्ये त्यांची भरपूर उदाहरणे चर्चिली गेली. संपूर्ण सत्र यू ट्यूबवर उपलब्ध करून दिलेले आहे. प्रकल्पात सहभागी झालेल्या सर्वांनी कृपया ते बघावे म्हणजे मुद्दे अधिक स्पष्ट होतील. तरीही काही शंका किंवा सूचना असल्यास प्रकल्पासाठी क्षेत्रांनुसार जे whats ap ग्रुप्स तयार केले आहेत त्यांवर आपल्या सूचना नोंदवाव्यात. आपण निवडलेल्या क्षेत्रात वरील बदलांचे काय प्रतिबिंब दिसून येते याचा मागोवा घेणे अभिप्रेत आहे. तो कसा घ्यावा, आपण निवडलेल्या क्षेत्रात संशोधनाचे काम कसे पुढे न्यावे याविषयीचा रोड मॅप व आराखडा स्वतंत्र लेखाद्वारे सादर केला जाईल.
गीताली वि.मं, करुणा गोखले
स्त्री चळवळीचा विविध क्षेत्रांवर प्रभाव
(१९७५-२०२५)
रोड मॅप
मागील लेखात ‘स्त्री चळवळीचा विविध क्षेत्रांवर प्रभाव’ म्हणजे नक्की काय याविषयीचा सविस्तर खुलासा करण्यात आला होता. या लेखात प्रकल्प-२ मधील कामाचा रोड मॅप आणि आराखडा सादर करत आहोत. प्रकल्प-२ मध्ये सहभागी झालेल्या सर्वांनी कृपया या आराखड्याची प्रत संदर्भासाठी स्वत:कडे ठेवावी.
टप्पा १- चळवळीचा प्रभाव ज्या क्षेत्रांवर अभ्यासायचा आहे, ती क्षेत्रे नक्की करून कोणत्या क्षेत्रासाठी किती स्वयंसेवक मिळाले आहेत त्यांची यादी करणे
टप्पा २- प्रत्येक क्षेत्राच्या स्वयंसेवकांचा स्वतंत्र whats ap ग्रुप तयार करणे.
(वरील दोन टप्प्यांमधील काम पूर्ण झाले आहे.)
टप्पा ३ –प्रत्येक टप्प्यातील स्वयंसेवकांनी झूम, कॉन्फरन्स कॉल वा whats ap वर गटचर्चा करून आपापल्या क्षेत्राची आणखी किती उपक्षेत्रे तयार करावी लागतील व प्रत्येक उपक्षेत्रात कोण काम करेल, हे ठरवणे.
टप्पा ४- प्रत्येक उपक्षेत्र पुनश्च कालखंडानुसार दोन किंवा तीन भागांत विभागणे. उदा: १९७५-९०, १९९१-२००५ व २००६-२०२४. गरजेनुसार हे खंड मोठे किंवा छोटे करता येतील.
टप्पा ५- प्रत्येक क्षेत्राने सर्वसंमतीने आपला समन्वयक ठरवणे. समन्वयक व्यक्ती दर महिन्याला आपल्या क्षेत्रातील सर्व विभागांच्या कामांचा आढावा घेईल.
टप्पा ६- क्षेत्र कुठेलेही असो, त्यातील अभ्यासाची दिशा आणि आराखडा काय असेल, ते ठरवणे. हे काम वेगळी कमिटी करेल व तिचे काम टप्पा १-५ च्या बरोबरीने समांतर सुरु असेल. हा आराखडा सर्व क्षेत्रांना समान असेल.
(टप्पा क्रमांक ६ मधील काम पूर्ण झाले असून लेखाच्या उर्वरित भागात अभ्यासाची दिशा व कामाचा आराखडा सविस्तर मांडला आहे. तसेच तो whats ap च्या माध्यमातूनसुध्दा सर्वांना उपलब्ध करून देत आहोत .)
टप्पा ७-‘कामाची दिशा आणि आराखडा’ यावर शक्य झाल्यास एक ऑफ लाईन किंवा ऑन लाईन कार्यशाळा घेतली जाईल. त्याच वेळी निवडलेल्या क्षेत्रातील तज्ज्ञांची यादी जाहीर केली जाईल. हे तज्ज्ञ प्रत्येक क्षेत्रांत काम करणाऱ्या व्यक्तींना अभ्यास साहित्य सुचवतील. असे साहित्य स्वयंसेवकांनीसुद्धा सुचवणे अभिप्रेत आहे.
टप्पा ८- सर्व क्षेत्रांतील समन्वयक आपल्या गटातील स्वयंसेवकांना वरील आराखडा स्पष्ट आहे ना याची खातरजमा करतील व मिळालेल्या आराखड्यानुसार त्यांच्याबरोबर आपापल्या क्षेत्रातील कामाचे तपशीलवार नियोजन आणि वेळापत्रक तयार करतील.
टप्पा ९- कोअर कमिटी दर ४ महिन्यांनी सर्व क्षेत्र समन्वयकांबरोबर आढावा मिटिंग घेईल. स्वयंसेवकांना ज्या अडचणी किंवा प्रश्न असतील, ते समन्वयक कोअर कमिटीपुढे मांडतील. व त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाईल.
टप्पा १०- लेखनास प्रारंभ केल्यानंतर स्वयंसेवक आपापल्या क्षेत्राच्या समन्वयकाच्या संपर्कात राहतील.लेखन पूर्ण झाल्यावर समन्वयक त्यावर चर्चा करून आवश्यक तेथे बदल सुचवतील.
टप्पा ११- लेखाचा अंतिम खर्डा समन्वयकामार्फत कोअर कमिटीस सादर केला जाईल.
प्रत्यक्ष कामाची रूपरेषा
स्त्री चळवळीचा प्रभाव
आपण निवडलेले अभ्यास क्षेत्र कुठलेही असो, त्यावरील अभ्यास करताना खाली नमूद केलेली रूपरेषा डोळ्यांसमोर ठेवून त्यानुसार काम पुढे नेल्यास व लेखन केल्यास अंतिमत: सर्व लेखांचा ढाचा समान राहील. तसेच अभ्यास टप्प्याटप्याने पुढे नेताना अभ्यासकाचा गोंधळ उडणार नाही.
दिनांक ८ ऑक्टोबर २०२३ रोजी गीतालीताईंच्या घरी जे दिशादर्शक सत्र झाले, त्यात आपण ‘स्त्री चळवळीचा प्रभाव’ या विषयाचे अनेक पैलू चर्चिले. (या मुद्द्यांचे टिपण प्रत्येक whats ap ग्रुपवर पाठवले आहे. तसेच त्यावरील सविस्तर लेख ‘मिळून साऱ्याजणी’ मध्ये प्रकाशितही झाला आहे. कृपया तो काळजीपूर्वक वाचावा.)
अभ्यासाची रूपरेषा व त्याची लिखित मांडणी
- सर्वप्रथम आपल्या क्षेत्रात १९७५ पर्यंत स्त्रीविषयक परिस्थिती काय होती याचा थोडक्यात आढावा घ्यावा. तो घेताना त्या क्षेत्रात स्त्रियांचा वावर होता/नव्हता/मर्यादित होता/ तो तसा असण्यात कायद्याचे, रूढी-परंपरांचे/ आर्थिक /मानसिक अडसर कोणते होते हे धुंडाळावे.
- स्त्री चळवळीच्या प्रभावामुळे त्या क्षेत्राबाबत खुद्द स्त्रीच्या/समाजाच्या/ शासनाच्या जाणिवा बदललेल्या दिसतात का याचा शोध घ्यावा.
- या जाणिवांतील बदल स्त्री चळवळीमुळेच कसे झाले आहेत याचा शोध घ्यावा (स्त्रीवादी लेखन. आंदोलने, संवेदनशील धोरणकर्ते, सामाजिक संघटनांचा प्रशासनावर दबाव इत्यादी.)
- स्त्री चळवळीव्यतिरिक्त इतर काही घटक परिस्थिती बदलास कारणीभूत झाले का, यांची चर्चा करावी.
- जाणिवा बदलल्याचे किंवा स्त्रियांच्या वावराचे कोणते परिणाम आपापल्या अभ्यास क्षेत्रात दिसून येतात याची चर्चा करावी. उदा: व्यक्त होण्यास सुरुवात, अभिव्यक्तीचा बदललेला पोत, मूल्यव्यवस्थेत बदल, कायद्यांत बदल, सुविधांची उपलब्धी, व्यवस्थेत रचनात्मक बदल, आर्थिक साहाय्य, इत्यादी.
- आपण निवडलेल्या क्षेत्रात स्त्रियांनी काही वेगळी मांडणी सुरु केली का? प्रचलित समजांमध्ये, धारणांमध्ये बदल घडवून आणले का? अस्तित्वात असलेल्या प्रश्नांना काही निराळी उत्तरे सुचवली का? याचा धांडोळा घेऊन ते नमूद करावे.
- विशिष्ट क्षेत्रात स्त्रियांचा वावर सुरू झाल्याने/वाढल्याने किंवा कमी झाल्याने त्याचे सामाजिक/ राजकीय/आर्थिक/मानसिक दृष्ट्या काय आनुषंगिक परिणाम झाले, ते नमूद करावे (सकारात्मक. नकारात्मक असे दोन्ही प्रकारचे )
- नव्याने निर्माण होणाऱ्या समस्यांवर कोणते उपाय सुचवले जात आहेत हे नमूद करावे.
वरील अभ्यास पूर्ण झाला की त्यावर तीन ते साडेतीन हजार शब्दांचा लेख लिहिणे अपेक्षित आहे. लेखाची मांडणी अभ्यासासाठी ज्या क्रमाने मुद्दे घेतले, त्याच क्रमाने असावी.
गीताली वि.मं, करुणा गोखले